ऑपरेशन सिंदूरच्या यशावर एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) च्या मुख्यमंत्र्यांची एक महत्त्वाची बैठक रविवारी दिल्लीत झाली. यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अभूतपूर्व यशाबाबत एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडला. या ठरावात, भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्यपूर्ण कृतीचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक, धाडसी आणि राष्ट्रीय हितसंबंधित नेतृत्वाचे विशेष कौतुक करण्यात आले. बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व एनडीए घटक पक्षांच्या नेत्यांनी एकमताने या प्रस्तावाला पाठिंबा दिला.

‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे सशस्त्र दलांनी दाखवलेले अतुलनीय धैर्य, धोरणात्मक कौशल्य आणि राष्ट्राप्रती समर्पण. सीमापार दहशतवाद्यांना स्पष्ट आणि निर्णायक संदेश. भारताच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याबाबत एनडीए सरकारची वचनबद्धता. मोदी सरकारच्या कार्यकाळात सशस्त्र दलांसाठी हाती घेण्यात आलेल्या ऐतिहासिक सुधारणा – एक पद एक पेन्शन, स्वदेशीकरण, सीमावर्ती भागात पायाभूत सुविधांचा विकास आणि त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करणे. ‘भारत कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला योग्य उत्तर देईल आणि तेही भारताच्या अटींवर’ – या नवीन राष्ट्रीय दृष्टिकोनाचे समर्थन.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ” ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी कारवाई नाही तर ती भारताच्या राष्ट्रीय इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत प्रत्येक आव्हानाला निर्भयपणे तोंड देत आहे. आज जगाला स्पष्ट संदेश देणे आवश्यक आहे – जो कोणी भारताचा सामना करेल तो नष्ट होईल. आपल्या सशस्त्र दलांची ताकद ही भारताच्या अतूट सुरक्षेची ढाल आहे.”