शेतकऱ्यांच्या परदेशी अभ्यास दौर्यांसाठी निधी मंजूर

महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी परदेशी अभ्यास दौऱ्यांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विकसित देशांतील आधुनिक शेतीपद्धती, तंत्रज्ञान आणि प्रक्रिया उद्योगाची माहिती मिळावी, या उद्देशाने ही योजना राबवण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत शेतकरी प्रतिनिधी मंडळांना युरोप, इस्रायल, जपान, नेदरलँड्स आदी देशांमध्ये भेट देण्याची संधी दिली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना स्मार्ट शेती, मृदाविज्ञान, पाण्याचे व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, आधुनिक यंत्रसामग्री, आणि अन्न प्रक्रिया उद्योगाचे प्रत्यक्ष निरीक्षण करता येईल.
मागील वर्षी अशाच अभ्यास दौऱ्यातून एकशे वीस शेतकरी सहभागी झाले होते आणि त्यासाठी सुमारे एक कोटी चाळीस लाख रुपये खर्च करण्यात आले होते. या शेतकऱ्यांनी परतल्यानंतर आपल्या गावात सेंद्रिय शेती, थेट ग्राहक विक्री आणि पीक बदल संकल्पना राबवल्या होत्या, असा सकारात्मक अनुभव कृषी विभागाने मांडला आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील प्रगतशील शेतकऱ्यांना नवे दृष्टीकोन मिळतील आणि आधुनिक शेतीत नवे प्रयोग होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येतो आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून निवडीत पारदर्शकता राखली जाणार असल्याचेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.