
नागपूर शहरात वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना झापले असून, नागपूरकरांना सतत होणाऱ्या त्रासाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत नागरिकांकडून वाढत्या प्रमाणात मिळणाऱ्या तक्रारी, रात्रीच्या वेळेस होणारे अचानक वीज खंडित होणे, पुरेशा माहितीअभावी निर्माण होणारी गैरसोय या सर्व मुद्द्यांवर गंभीर चर्चा झाली.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी चालू असलेल्या रस्त्याच्या खोदकामामुळे केबल तुटल्याने तांत्रिक अडथळा निर्माण झाल्याचे कारण सांगितले. मात्र हे उत्तर मुख्यमंत्री व गडकरी यांना समाधानकारक वाटले नाही. त्यांनी अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन सविस्तर कार्ययोजना तयार करण्याचे आदेशही देण्यात आले.
या बैठकीत रस्त्यांची दुरवस्था, वेळेत पुनर्बांधणी न होणे, विजेसाठी खणलेल्या रस्त्यांचे काम पूर्ण होऊनही त्याची योग्य डागडुजी न होणे यावरही चर्चा झाली. नितीन गडकरी यांनी संबंधित यंत्रणांना फटकारले व कंत्राटदारांकडून वेळेवर काम करून घेण्यास भाग पाडावे, अशी स्पष्ट भूमिका घेतली. यावर मुख्यमंत्र्यांनीही सहमती दर्शवत जबाबदार अधिकाऱ्यांनी तातडीने सुधारणा कराव्यात असे स्पष्ट निर्देश दिले.