
भारतामध्ये मोबाइल गेमिंगचा वापर प्रचंड वाढला असून, जवळपास चाळीस कोटीहून अधिक लोक हे अॅप्स वापरत आहेत. मात्र, यामध्ये अनेक फसवणूक करणारे आणि सायबर गुन्हे घडवणारे अॅप्स कार्यरत असून, या अॅप्समुळे तरुणांचा वैयक्तिक डेटा चोरीला जात आहे आणि त्यांचा गैरवापर केला जातो आहे.
गृहमंत्रालयाच्या सायबर सुरक्षा विभागानुसार, काही गेमिंग अॅप्समध्ये वापरकर्त्यांकडून विविध परवानग्या घेतल्या जातात – जसे की फोन गॅलरी, कॉन्टॅक्ट्स, लोकेशन, ओटीपी वाचण्याची परवानगी – ज्याचा वापर नंतर आर्थिक फसवणूक किंवा ब्लॅकमेलिंगसाठी केला जातो. काही प्रकरणांमध्ये युवकांचे फोटो, चॅट्स किंवा वैयक्तिक माहितीचा आधार घेत पैसे मागितले जातात.
या गेम्समध्ये ‘गिफ्ट्स’ किंवा ‘कॅश रिवॉर्ड्स’च्या नावाखाली पैसे भरण्याचा मोह दाखवून सुरुवातीला लहान रक्कम मागितली जाते आणि नंतर मोठ्या रकमेची मागणी केली जाते. काही वेळा तर यामध्ये वापरकर्ते कर्ज घेऊन गेम खेळताना दिसतात. मानसिक ताण, व्यसन, निद्रानाश, आणि कुटुंबातील तणाव या प्रकारातून अनेक तरुणांना आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचवले आहे.
गृहमंत्रालयाने आतापर्यंत पाचशे ऐंशी पेक्षा अधिक अशा संशयित अॅप्सवर बंदी घातली आहे. नागरिकांना ‘१९३०’ या हेल्पलाईनवर किंवा cybercrime.gov.in या वेबसाइटवर तक्रार नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी सुचवले आहे की कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी ते कोण बनवतंय, त्याच्या परवानग्या काय आहेत, याची नीट तपासणी करावी.