
पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर बेकायदा बांधकामांवर मोठी कारवाई करण्यात आली असून, सुमारे वीस हजार चौरस फूट क्षेत्रातील अनधिकृत आरसीसी व दगडी संरचना हटविण्यात आल्या आहेत. ही कारवाई दिनांक २९ मे २०२५ पासून सुरू झाली होती आणि ५ जूनपर्यंत पूर्ण करण्यात आली आहे.
कारवाईच्या दरम्यान पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने किल्ला तात्पुरता बंद ठेवण्यात आला होता. या काळात धोकादायक दरडी हटविण्याचे कामही पूर्ण करण्यात आले. सिंहगड किल्ला पाच जूनपासून पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.
या कारवाईत वन विभाग, पुरातत्व विभाग, महसूल विभाग आणि पोलिस प्रशासन यांनी समन्वय साधून काम केले. विशेषतः नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाकडे जाणाऱ्या मुख्य पायी मार्गावरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली.
जिल्हा प्रशासनाने भविष्यात गडावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ नये, यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे सिंहगड किल्ल्याचे ऐतिहासिक पावित्र्य जपले गेले असून, पर्यटकांना अधिक सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात गडभेटीचा आनंद घेता येणार आहे.