देशभरात बालश्रम विरोधात मोठी मोहीम

एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत देशभरात शोषणातून मुक्त करण्यात आलेल्या चव्वेचाळीस हजार नौशे दोन मुलांपैकी तब्बल तेवीस हजार पाचशे तीस मुलं बालश्रमात अडकलेली होती, ही गंभीर बाब आहे. ही आकडेवारी देशात अद्यापही बालश्रमाचा विळखा मोठ्या प्रमाणात असल्याचे दाखवते.

या मोहिमेद्वारे सर्वाधिक बालश्रमाची प्रकरणं तेलंगणामध्ये आढळून आली असून, एकट्या तेलंगणातून अकरा हजार त्रेचाळीस मुलांची सुटका करण्यात आली. त्यानंतर बिहार तीन हजार नऊशे चौऱ्याहत्तर, राजस्थान तीन हजार आठशे सत्तेचाळीस, उत्तर प्रदेश तीन हजार आठशे चार आणि दिल्ली दोन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव या राज्यांतही लक्षणीय संख्येने बालश्रम करणारी मुलं सापडली आहेत.

या मोहीमांद्वारे एकूण सत्तावीस हजार तीनशे वीस ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यापैकी पंचेचाळीस टक्के प्रकरणांत प्रथमदर्शनी तक्रारी दाखल करण्यात आल्या. उर्वरित प्रकरणांमध्ये जनरल डायरी, बालकल्याण समितीकडे संदर्भ, किंवा कोणतीही कारवाई न करता सोडून देण्यात आलं. त्यामुळे बचावासोबतच कायदेशीर कारवाई व पुनर्वसन अधिक प्रभावी करण्याची गरज आहे.

बालश्रमाचा खात्मा फक्त कारवाईने होणार नाही, तर समाजाच्या मानसिकतेत बदल, शिक्षणाचा प्रसार, आणि मुलांच्या मूलभूत हक्कांची जाणीव यामुळेच ही लढाई जिंकता येईल. शासन, पालक, शाळा आणि नागरिकांनी मिळून हा अन्याय संपवण्यासाठी पुढाकार घ्यावा, हेच या मोहिमेचे मोलाचे संदेश आहे.