पावसाळ्यात धोकादायक ठरणाऱ्या पर्यटनस्थळांवर प्रवेश बंदी

महाराष्ट्रात पावसाळा सुरू होताच राज्य शासनाने अनेक पर्यटनस्थळांवर तात्पुरती प्रवेश बंदी लागू केली आहे. मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका वाढलेला असून, धबधबे व तलाव परिसरात पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे जीवितहानीची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारने ही खबरदारीची उपाययोजना केली आहे.

सातारा जिल्ह्यात २० जूनपासून १९ ऑगस्टपर्यंत महाबळेश्वर, पाचगणी, ठोसेघर, वज्राई, लिंगमळा धबधबा आणि अजिंक्यतारा किल्ल्यावर प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी धबधब्याजवळ पोहणे, फोटो काढणे, मद्यपान करणे, गोंधळ घालणे व कचरा टाकणे यास कडक मनाई आहे. स्थानिक प्रशासनाने गस्त वाढवली असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यातील लोणावळा व मावळ परिसरातील एकविरा देवी मंदिर, कार्ला-भाजे लेणी, लोहगड, विसापूर, टिकोना किल्ला, टायगर व शिवलिंग पॉईंट, पवना धरण या ठिकाणी ३१ ऑगस्टपर्यंत बंदी लागू करण्यात आली आहे. येथे होणारी गर्दी, निसरडे पायवाटांचे अपघात, व प्रवाहातील वाढ लक्षात घेता हे पाऊल उचलण्यात आले आहे.

तसेच रायगड जिल्ह्यातील देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हिणी घाट परिसरात १७ जूनपासून ३० सप्टेंबरपर्यंत १ किलोमीटरच्या परिघात सर्व प्रकारचा वावर, सेल्फी, पोहणे, मद्यपान, गोंधळ आणि प्लास्टिक टाकणे यावर बंदी घालण्यात आली आहे. दरवर्षी या परिसरात अपघात आणि मृत्यूच्या घटना घडत असल्यामुळे ही खबरदारी घेतली गेली आहे.

मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असून धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावणे, सुरक्षा यंत्रणा तैनात करणे, आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करणे आणि आवश्यकता भासल्यास पर्यटनस्थळ पूर्णतः बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ही बंदी केवळ सुरक्षेसाठी असून पर्यटकांनी त्यात सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.