
पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या वारीसाठी देशभरातून लाखो भाविक दाखल होतात. यावेळी भक्तांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रसाद, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांची विक्री होते. मात्र, काही ठिकाणी भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ विकले जातात. त्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
ही परिस्थिती लक्षात घेता अन्न व औषध प्रशासन विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. आषाढी वारीदरम्यान पंढरपूरमधील प्रसाद व मिठाई विक्री करणाऱ्या दुकानदारांवर नजर ठेवली जाणार आहे. दुकानदारांकडून अन्नपदार्थांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत चाचणी केली जाणार असून, भेसळ आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भाविकांना केवळ प्रमाणित, शुद्ध व सुरक्षित अन्नच मिळावे, यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर दंडात्मक कारवाई, परवाना रद्द करणे, अथवा माल जप्ती अशा कठोर पावलं उचलण्यात येतील.
वारकऱ्यांनीही सावधगिरी बाळगावी, फक्त अधिकृत दुकानांतूनच प्रसाद खरेदी करावा, अन्न विक्रेत्यांकडून पावती/बिल मागावे, आणि विक्रीवर शंका आल्यास त्वरित स्थानिक प्रशासन किंवा एफडीए कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.