इराण इस्रायल संघर्षाचा जागतिक व्यापारावर परिणाम

मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला असून, दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले सुरू ठेवले आहेत. इराणकडून इस्रायलमधील नागरी भागांवर क्षेपणास्त्र डागण्यात आली असून, त्यात सुमारे दोनशेहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. प्रत्युत्तरात इस्रायलने इराणमधील लष्करी केंद्रे, अणु संशोधन संस्था आणि रडार यंत्रणा यांना लक्ष्य करत जोरदार हवाई हल्ले केले आहेत.

या संघर्षामुळे दोन्ही देशांचे आर्थिक नुकसानही प्रचंड प्रमाणावर होत आहे. सुरुवातीच्या फक्त दोन दिवसांतच इस्रायलने दीड अब्ज अमेरिकी डॉलरच्या आसपासचा खर्च केला असून, दिवसागणिक हा खर्च वाढत आहे. इराणकडेही मोठ्या प्रमाणावर संसाधनांचा वापर केला जात आहे, ज्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था अधिक तणावाखाली आली आहे.

या युद्धजन्य वातावरणाचा परिणाम भारत आणि पाकिस्तानसारख्या शेजारी देशांवरही दिसून येत आहे. भारताने इराणमधील चाबहार बंदरात मोठी गुंतवणूक केलेली असून, या बंदराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या अस्थिर भागांमध्ये दहशतवादी संघटनांच्या हालचाली वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी अमेरिकेशी संपर्क साधून या अस्थिरतेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन सिंधू’ राबवले असून, आतापर्यंत इराणमधून ११० भारतीयांना सुरक्षितपणे परत आणण्यात आले आहे. परिस्थिती अधिक बिघडण्याची शक्यता लक्षात घेता, अन्य देशही त्यांच्या नागरिकांना तेथून बाहेर काढण्याच्या तयारीत आहेत. संपूर्ण आशिया खंडात या संघर्षामुळे अस्थैर्य निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.