
इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इराणने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय नागरिकांच्या विशेषतः विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी, इराणने आपले हवाई क्षेत्र भारतासाठी तात्पुरते खुलं केलं आहे. युद्धाच्या भीषण सावटाखाली असतानाही मानवी संवेदना जपत घेतलेला हा निर्णय अत्यंत स्तुत्य ठरतो.
‘ऑपरेशन सिंधू’ या मोहिमेअंतर्गत भारत सरकारने इराणमध्ये अडकलेल्या सुमारे १,००० भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्याचे नियोजन केले. त्यानुसार, माशहद शहरातून तीन विशेष विमानांचे आयोजन करण्यात आले असून, यातील पहिले विमान २० जून रोजी रात्री दिल्लीत पोहोचण्याची शक्यता आहे. उर्वरित दोन विमानांसाठी पुढील वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
या संकटाच्या काळात भारत सरकारने जलद आणि ठोस पावले उचलून आपले नागरिक सुरक्षितपणे मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. दुसरीकडे, इराणने युद्धाच्या कठीण परिस्थितीतही भारताच्या विनंतीला मान देऊन हवाई मार्ग उघडल्यामुळे दोन्ही देशांमधील परस्परसंबंध अधिक दृढ झाले आहेत.