गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचे आरक्षण आजपासून सुरू

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाकडून खास व्यवस्था करण्यात आली असून, २३ जूनपासून रेल्वे तिकीट आरक्षणाला सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, ठाणे व परिसरातील हजारो नागरिक दरवर्षी आपल्या गावी गणेशोत्सवासाठी जात असतात. त्यामुळे या काळात रेल्वे प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते.
यंदा २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणेश चतुर्थी असून, त्यापूर्वी अनेक प्रवासी कोकणात जाण्याची योजना आखत आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वेने गणेशोत्सव विशेष गाड्यांसह नियमित गाड्यांमध्येही आरक्षण खुलं केलं आहे. कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कणकवली, सावंतवाडी, कुडाळ आदी प्रमुख ठिकाणांसाठी तिकीट आरक्षण सुरू झालं आहे.
गेल्या काही वर्षांत तिकीट दलालांमार्फत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याने यंदा रेल्वे प्रशासन अधिक सतर्क आहे. प्रवाशांनी अधिकृत रेल्वे आरक्षण केंद्र, मोबाइल अॅप किंवा संकेतस्थळाच्या माध्यमातूनच तिकीट बुक करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. तिकीट बुक करताना ओळखपत्राची माहिती आणि प्रवासाचा तपशील अचूक द्यावा लागणार आहे.
ही सेवा सुरू झाल्याने गणेशभक्तांसाठी दिलासा मिळाला आहे. कोकणात आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना वेळेत तिकीट मिळावे, प्रवास सुलभ व्हावा आणि अनावश्यक गर्दी टळावी, हा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे जे कोकणात गणेशोत्सव साजरा करतात, त्यांनी लवकरात लवकर आपलं आरक्षण पूर्ण करून ठेवावं, असा संदेश रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आला आहे.