गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचे आरक्षण सुरू

यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. दिनांक २३ जून २०२५ पासून कोकण मार्गावरील नियमित गाड्यांचे आरक्षण सुरू होणार आहे. यावर्षी दिनांक २७ ऑगस्ट रोजी गणेशचतुर्थी असून त्याआधी दोन दिवस म्हणजे २५ व २६ ऑगस्ट रोजी कोकणात जाणाऱ्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही कोकणातील गावाकडे जाण्यासाठी रेल्वे तिकीट मिळवण्यासाठी चढाओढ दिसून येणार आहे. अनेक प्रवासी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर आरक्षण सुरू होताच काही मिनिटांतच तिकीट पूर्ण होतात. त्यामुळे तिकीट दलालांकडून वाढीव दराने तिकीट विक्री होण्याची भीती व्यक्त होत आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून दरवर्षीप्रमाणे विशेष गाड्यांची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. सध्या मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, डोंबिवली, कल्याण आदी शहरांमधून कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्यांचे तिकीट आरक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. प्रवाशांनी २३ जूनपासून आरक्षण सुरुवातीच्या दिवशीच करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणे हे अनेक चाकरमान्यांसाठी वर्षातील एक विशेष वेळ असतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आरक्षण, सुलभ प्रवास, अतिरिक्त डबे, तसेच यंत्रणांची दक्षता यावर भर द्यावा, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, यावर्षी मुसळधार पावसाचा इशारा असतानाही रेल्वे मार्ग सुरक्षित राहावा म्हणून पावसाळी वेळापत्रक, यांत्रिक देखरेख आणि आपत्कालीन पथकांची तयारी सुरू आहे.