महाराष्ट्रात एटीएसची मोठी कारवाई

महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने पुणे आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंजवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून, हजारो सिमकार्ड्स, सिम बॉक्सेस आणि अन्य उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

ऑगस्ट 2024 मध्ये पुणे एटीएसने कोंढवा येथील एम.ए. कॉम्प्लेक्समधील एका फ्लॅटवर छापा टाकून बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंज उघडकीस आणले. या ठिकाणी तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी सिमकार्ड्स, सात सिम बॉक्सेस, नऊ  वाय-फाय राउटर्स, अँटेना, इन्व्हर्टर आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले. या प्रकरणात नऊ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचे समोर आले आहे. प्राथमिक तपासणीत, आरोपींनी व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्स भाड्याने देणे आणि क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. जुलै 2024 मध्ये ठाणे एटीएसची ने भिवंडी आणि नालासोपारा येथे बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंजवर छापे टाकले. या कारवाईत नऊ सिम बॉक्सेस, दोनशे सेहेचाळीस मकार्ड्स, आठ वाय-फाय राउटर्स आणि एकशे एक्क्याण्णव अँटेना जप्त करण्यात आले. या एक्सचेंजमुळे सरकार आणि मोबाईल सेवा पुरवठादारांना सुमारे तीन कोटी रुपयांचा आर्थिक तोटा झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात जाफर बाबू उस्मान पटेल याला अटक करण्यात आली आहे.

एटीएसच्या तपासणीत असे आढळले आहे की, या बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंजचा वापर आंतरराष्ट्रीय कॉल्सना स्थानिक कॉल्सप्रमाणे दर्शवून सरकारच्या महसुलात गडबड करण्यासाठी केला जात होता. या प्रणालीचा वापर दहशतवादी किंवा इतर बेकायदेशीर क्रियाकलापांसाठी होण्याची शक्यता असल्याने, तपास यंत्रणा सतर्क आहेत. या कारवायांमुळे महाराष्ट्रात बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंजच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीवर आणि संभाव्य दहशतवादी क्रियाकलापांवर अंकुश ठेवण्यास मदत झाली आहे.