
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लांबच लांब वेटिंग यादीमुळे प्रवासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिकीट मिळेल की नाही, या चिंतेत असलेल्या प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे. कारण रेल्वेने असा नियम लागू केला आहे, की प्रवासाच्या २४ तास आधीच तिकीट निश्चित होणार की नाही याची माहिती प्रवाशांना मिळणार आहे.
आतापर्यंत अनेक प्रवासी शेवटच्या क्षणी प्रवास रद्द करीत असत किंवा पर्यायी व्यवस्था करत असत. परंतु या नव्या निर्णयामुळे प्रवाशांना आगाऊ योजना करता येणार असून, प्रवास सुकर होईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हा नियम जुलै महिन्यापासून देशभर लागू होणार आहे. रेल्वेने सांगितले की, या नव्या व्यवस्थेमुळे तिकीट वितरणातील पारदर्शकता आणि प्रवाशांचा विश्वास वाढेल. लांबच्या प्रवासासाठी प्रवासी कोणतीही गोंधळ न करता स्पष्ट नियोजन करू शकतील.
याव्यतिरिक्त, रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक नव्या सुविधा सुरू करण्याचा विचारही चालवला आहे. त्यामध्ये तिकीट बुकिंगसाठी जलद प्रक्रिया, मोबाइलवर सूचना, तसेच तिकीट रद्द करणाऱ्यांना त्वरित परतावा मिळावा यासाठी तांत्रिक सुधारणा करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.
रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, प्रवाशांचे अनुभव अधिक चांगले करण्यासाठी यंत्रणेत बदल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक वापर केला जाणार आहे.