
दिल्ली आणि आसपासच्या भागांमध्ये पुढील काही दिवसांत मान्सूनचे प्रभावी आगमन होणार असून, हवामान विभागाने दिनांक 24 जूनपासून जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सोमवारपासून वातावरणात बदल होत असून, ढगाळ हवामान आणि हलक्या सरी पडत आहेत. त्यामुळे उष्णतेची तीव्रता काहीशी कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.
मंगळवार व बुधवार या दिवशी दिवसभर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. वाऱ्याची गती ताशी तीस ते पन्नास किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता असल्याने, झाडे, जाहिरात फलक आणि उघड्या जागांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
२६ जूनपासून पुढील तीन ते चार दिवस दिल्ली आणि एनसीआर परिसरात सतत ढगाळ वातावरण, दमट हवामान आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील. यामुळे शहरातील काही ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता असून, वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो. हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला असून, नागरिकांनी आवश्यक तयारी ठेवण्याचे सुचवले आहे.
उत्तर भारतातील इतर राज्यांमध्येही मान्सूनचा जोर वाढत आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांतही मान्सूनने प्रवेश केला असून, या प्रदेशांमध्येही पुढील काही दिवस धोधो पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी आणि नागरी व्यवस्थेसाठी आगामी आठवडा महत्त्वाचा ठरणार आहे.