हवामान बदलामुळे मानवी आरोग्य धोक्यात – जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

जगभर वाढत असलेले तापमान, दुष्काळ, पूर आणि प्रदूषण यामुळे आता हवामान बदलाचे परिणाम थेट मानवी आरोग्यावर उमटू लागले आहेत. जागतिक आरोग्य संघटना आणि ‘लॅन्सेट काउंटडाउन ऑन हेल्थ अँड क्लायमेट चेंज’ या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या 2025 च्या अहवालात या परिस्थितीबाबत गंभीर इशारा देण्यात आला आहे. अहवालानुसार, हवामान बदल हे केवळ पर्यावरणाचे संकट नसून ते एक मोठे आरोग्य संकट बनले आहे. उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून त्याचा परिणाम आरोग्य व्यवस्था, अर्थव्यवस्था आणि अन्नसुरक्षा यांवर दिसून येत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे सहाय्यक महासंचालक डॉ. जेरेमी फॅरर यांनी सांगितले की, “हवामान संकट म्हणजेच आरोग्य संकट आहे. तापमानातील प्रत्येक अंशवाढ म्हणजे जीवितहानी आणि आजारपणाची वाढ होय. मात्र हवामान बदलावर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेली कृतीच मानवी आरोग्याचे सर्वात मोठे रक्षण ठरू शकते.”

अहवालानुसार, उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण एकोणनव्वदच्या दशकानंतर तेवीस टक्क्यांनी वाढले असून, दरवर्षी सुमारे पाच लाख लोकांचा मृत्यू उष्णतेमुळे होत आहे. 2024 या वर्षी प्रत्येक व्यक्तीला सरासरी सोळा दिवस अत्यंत उष्णतेचा अनुभव आला, जो दोन दशकांपूर्वीपेक्षा चारपट अधिक आहे. तसेच दुष्काळ आणि तीव्र उष्णतेमुळे बारा कोटी चाळीस लाख लोकांना अन्नटंचाईचा सामना करावा लागला आहे.

या अहवालात नमूद केले आहे की, उष्णतेमुळे श्रमक्षमता घटल्याने 2024 मध्ये जगभरात सहाशे चाळीस अब्ज कामाचे तास वाया गेले, ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला तब्बल एक पूर्णांक शून्य नऊ ट्रिलियन डॉलर इतका तोटा झाला. फॉसिल इंधनांवर अवलंबून असलेल्या देशांनी 2023 मध्ये नऊशे छप्पन्न अब्ज डॉलर इतकी अनुदाने दिली, जी हवामान कृतीसाठी दिलेल्या निधीपेक्षा तिप्पट जास्त होती.

अनेक देशांनी हवामानाशी संबंधित आरोग्य जोखीम मूल्यांकन आणि आरोग्य योजना तयार केल्या असून, आरोग्य क्षेत्राने स्वतःचे कार्बन उत्सर्जन सोळा टक्क्यांनी कमी केले आहे. येत्या ब्राझीलमधील ‘सीओपी तीस’ परिषदेत “बेलें कृती आराखडा” सादर केला जाणार असून, त्यात आरोग्य, समता आणि टिकाऊ विकास यांवर भर दिला जाणार आहे.






4,890 वेळा पाहिलं