
परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी महत्व्णपूर्ण असणारे येलदरी धरण हे पर्यटकांसाठी एक मनमोहक ठिकाण आहे. हे धरण पूर्णा नदीवर बांधले आहे. पूर्णा ही गोदावरीची एक प्रमुख उपनदी आहे. महत्वाचे म्हणजे या धरणामुळे परभणी, जिंतूर, वसमत व हिंगोली जिल्ह्याचा पाणीप्रश्न सुटला आहे. या धरणाजवळ पर्यटकांसाठी दोन कोटी 99 लाख रुपये खर्चून मोठ्या उद्यान निर्मितीचे काम चालू आहे. लहान मुलांसह अनेक पर्यटक या उद्यानास भेट देण्यासाठी जातात. या उद्यानात खेळणी, प्राण्यांचे पुतळे असे विविध प्रकारचे साहित्य आहे. मात्र या परिसरात राहण्याची चांगली व्यवस्था नाही. जेवणासाठी छोटी हॉटेल्स आहेत.
जिंतूर तालुक्यातील येलदरी या गावाजवळ हे धरण असून हिंगोलीच्या वायव्येला हिंगोली-जिंतूर मार्गावर येते. शेतीसाठी पाणी पुरवून वीजनिर्मिती करण्यासाठी या धरणाची उभारणी करण्यात आली; परंतु आता परभणी आणि हिंगोलीतील अनेक शहरे पिण्याच्या पाण्यासाठी या धरणावर अवलंबून आहेत. येलदरीच्या वरच्या बाजूला खडकपूर्णा धरण आहे. ते भरले की येलदरी धरणात पाणी सोडण्यात येते. सन 1958 मध्ये सुरू झालेले येलदरी धरणाचे बांधकाम सन 1968 मध्ये पूर्ण झाले. एकूणच, या बांधकामास तब्बल दहा वर्षे लागली. आता या धरणाच्या दिशेने पर्यटकांची पावले आपोआप वळतात. लहान मुलांसह मोठ्या माणसांची येथे गर्दी असते. त्यामुळे हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून नावारुपाला येत आहे.