
आयुष्याने दिलेल्या प्रत्येक संधीचं त्यांनी सोनं केले. समोर अडचणीही बऱ्याच आल्या, पण कुणीही त्यांना रोखू शकलं नाही. प्रतिकूल परिस्थितीतही पदमश्री डॉ.तात्याराव लहाने यांनी केवळ स्वतःचच नाही, तर आपल्यासोबत अनेकांचं आयुष्य उजळून टाकलं आहे.
आपल्याकडे मुबलक शेती नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबाची परिस्थती सुधारावी असं वाटत असेल, तर शिक्षण घ्यायलाच हवं. याची जाणीव त्यांना त्या लहान वयात होती. त्याच दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरु होते,.पण म्हणून डॉक्टर वगैरे होणं त्यांच्या ध्यानीमनीही नव्हतं.
खरं डॉ.लहाने यांना अस्थिरोगतज्ञ किंवा बालरोगतज्ञ व्हायचं होतं. पण नेत्रचिकित्सा शास्त्रात ७०० रुपये स्टायपेंड मिळत होता, म्हणून त्यांनी हा प्रवेश स्वीकारला. अर्थात त्यांचा हा निर्णय सर्व नेत्र रुग्णांसाठी वरदानच ठरला.
लाखो लोकांना दृष्टीचं दान देणारे दृष्टिदाते म्हणून पदमश्री डॉ.तात्याराव लहाने यांची ओळख आहे. खरं तर हे एक वाक्यच त्यांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी पुरेसं आहे. पण म्हणून त्याची ओळख एवढीच नाही. प्रतिकूल परिस्थितीतही खचून न जाता आशावादी राहणारे, प्रत्येक संधीचं सोनं करणारे आणि आज एवढ्या मोठ्या पदावर असूनही सामान्य वाटणारे, सामान्यांमध्ये सहज वावरणारे, रुंगणांच्या व्यथा जाणून घेऊन परिस्थिती सुधारावी म्हणून प्रामाणिक प्रयत्न करणारे… असं बरंच काही डॉ.लहानेविषयी सांगता येईल.
लातूर जिल्ह्यातील माथेगावमधील एका गरीब शेतकरी कटुंबात डॉ.लहाने यांचा जन्म झाला. गावातील इतर मुलांप्रमाणे ते आपल्या आईवडिलांना शेतीच्या आणि इतर कामात मदत करत होते. सकाळ-संध्याकाळ गुरं राखण्याचं काम त्यांचं असे. अशातच योगायोगाने त्यांचा शाळेत प्रवेश झाला. याविषयी सांगताना ते बालपणीच्या आठवणीत रमतात, ‘मी पाच वर्षांचा होतो तेव्हा. आमच्या गावात प्राथमिक शाळा सुरु झाली. शाळा चालविण्यासाठी किमान दहा मुलांची आवश्यकता होती आणि मी त्या वयोगटात मोडत होतो, म्हणून माझा शाळेत प्रवेश झाला.’ सकाळी गुरे राखून शाळेत जायचं आणि संध्याकाळी शाळातून परतल्यावर पुन्हा गुरे राखायची, असा त्यांचा दिनक्रम असे. त्यात सुट्टीच्या दिवशी आणि गरज पडली तर शाळेला दांडी मारूनसुद्धा त्यांना वडिलांना शेतीच्या कामात मदत करावी लागत असे. शिवाय घरी कंदील तर सोडाच चिमणीही नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अभ्यास करणं, अशक्य होतं. मग दिवसा इतर सर्व जबाबदाऱ्या पार पाडत अभ्यास करणे… अशा परिस्थितीतही ते चौथीला बोर्डात पहिले आले होते. मित्र आणि शिक्षकांच्या मदतीनेच हे शक्य झाल्याचं ते आवर्जून सांगतात.
तरीही त्याच्यासाठी पाचवीचा प्रवेश सोपा नव्हता. ‘आईबाबांना माझी शिक्षणासाठीची ओढ कळत होती. आईचा मला त्यादृष्टीने पूर्ण पाठिंबाही होता. माझ्या वह्या-पुस्तकांसाठी आईने प्रसंगी घरात आलेला माल चोरून विकल्याचेही मी पहिले होतं, बाबाना यांची जाणीव नव्हती असं नाही, पण घरचा थोरला मुलगा म्हणून माझ्या काही जबाबदाऱ्या आहेत, हे विसरून त्यांना आणि मलाही चालण्यासारखं नव्हतं. म्हणूनच शेतीच कामं संपल्यावर तब्बल तीन महिने उशिराने का होईना पण त्यांनी मला पाचवीत प्रवेश घेण्याची परवानगी दिली.’ हुशार विद्यार्थी असल्यामुळे शिक्षकांनीही त्यांना प्रवेश दिला. इतकेच नाही तर बुडालेला अभ्यासही विशेष शिकवण्या देऊन करवून घेतला. परिणामी, सातवीतही ते बोर्डात पहिले आले.
आपल्याकडे मुबलक शेती नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबाची परिस्थती सुधारावी असं वाटत असेल, तर शिक्षण घ्यायलाच हवं. याची जाणीव त्यांना त्या लहान वयात होती. त्याच दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरु होते, पण म्हणून डॉक्टर वगैरे होणं त्यांच्या ध्यानीमनीही नव्हतं. याविषयी हसतच ते सांगतात, शिक्षण ‘शिक्षण घेतलेला शिक्षक होतो, एवढंच माहित होतं. त्यामुळे शिक्षक होणं हेच कुठेतरी आयुष्याचं ध्येय बनलं होतं. पण मी दहावीत असताना शेजारच्या लहानेवाडी गावातला कुणी एक मुलगा डॉक्टर झाला आणि त्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली. तेव्हा शिकून डॉक्टरही होता येतं याची मला जाणीव झाली आणि नकळत आपण डॉक्टर व्हावं, असं मनाशी पक्कं झालं.’
त्यांच्या या जबर इच्छाशक्तीला गरिबी किंवा अन्य कोणत्याही समस्या रोखू शकल्या नाहीत. त्यांनी आपल्या भावंडानाही शिक्षणासाठी प्रवृत्त केले. शिक्षकांच्या सांगण्यावरून त्यांनी औरंगाबादच्या वैजनाथ महाविद्यालयात वैद्यकीय शाखेत प्रवेश घेतला. त्यासाठीच्या प्रवेश परीक्षेत ते मराठवाड्यात दहावे आले होते. प्रवेश तर मिळाला. पण फी आणि इतर खर्चासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. शिक्षक आणि मित्रांनी इथेही त्यांना खूप मदत केली. काहींनी पुस्तकं घेऊन दिली. काहींनी कपडे-बूट, तर काहींनी फी भरण्यासाठी रक्कम जमा करून दिली. दरम्यानच्या काळात त्यांचा सुलोचना मुंढे यांच्याशी विवाह झाला.
डॉ.लहाने सांगतात, आमदार रघुनाथ मुंढे याची एकूक्ती एक कन्या, सुलोचनाने आमच्या परिस्थितीशी आनंदाने जुळवून घेतलं. शिवाय तिच्या वडिलांमुळे मलाही थोडा आधार वाटू लागला होता.’ पण ही परिस्थिती काही जास्त वेळ राहिली नाही. नेमक्या परीक्षेच्या दिवशी एका अपघातात त्याच्या सासऱ्यांच्या मृत्यू झाला आणि डॉ.लहानेंवर दोन्ही घराची जबाबदारी येऊन पडली. खरं डॉ.लहाने यांना अस्थिरोगतज्ञ किंवा बालरोगतज्ञ व्हायचं होतं. पण नेत्रचिकित्सा शास्त्रात ७०० रुपये स्टायपेंड मिळत होता, म्हणून त्यांनी हा प्रवेश स्वीकारला. अर्थात त्यांचा हा निर्णय सर्व नेत्र रुग्णांसाठी वरदानच ठरला.

सर्वकाही सुरळीत वाटत असताना डॉ.लहाने यांचे दोन्ही मूत्रपिंड निकामी झाले होते. त्यांच्या आईने त्यांना आपले मूत्रपिंड दिले. गरिबी अगदी जवळून पाहिल्यामुळे त्यांच्यामध्ये सामाजिक भान होतेच, पण या घटनेने त्यांना अधिकच भारावून टाकलं. समाजासाठी आपणही काही काही केलं पाहिजे ही त्यांच्या मनातील इच्छा अधिक प्रबळ झाली.हे भान राखत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत ठाणे, पालघर, जव्हार, मोखाडा, डहाणू, धुळे, नंदुबार येथील हजारो आदिवासी पाड्यांमध्ये शस्त्रक्रियेसाठी अनेक शिबिरं आयोजित केली आहेत. आनंदवनातील हजारो कुष्ठरोग्यांवरही मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत. पारंपारिक शस्त्रक्रियेनंतर रुंगणाला किमान ४० दिवस विश्रांती घ्यावी लागते. स्वतः ग्रामीण भागातून आल्यामुळे, या ग्रामीण लोकांचा एक-एक दिवस किती मोलाचा असतो याची जाणीव त्यांना आहे. म्हणूनच त्यांनी बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. यामुळे रुग्णांना नवी दृष्टी तर मिळालीच,पण आर्थिक घडी विस्कटत नसल्यामुळे रुग्ण शस्त्रक्रियेसाठीही तयार होऊ लागले. असा हा विचारवंत डॉक्टर आहे. गोरगरिबांसाठी अशा अनेक योजना त्यांनी कार्यान्वित केल्या आहेत. विज्ञानाच्या प्रगतीच्या दृष्टीने त्यांचे विचार अत्यंत पुरोगामी आहेत. समाजातल्या सर्व स्तरांमध्ये देहदान, अवयवदान यांच्याविषयी जागरूकता वाढावी असं त्यांना प्रखरतेने वाटते.
डॉ.तात्याराव लहाने सद्य मुंबईतील जमशेदजी जिजीभॉय (जे.जे.) रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदी कार्यरत आहेत. आतापर्यंत सुमारे १ लाख ४७ हजार डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ.लहाने यांनी जे.जे. सारख्या सरकारी रुग्णालयाच्या पूर्णतः कायापालट केला आहे. २००७ मध्ये डॉ.लहाने यांनी आपली एक लाखावी शस्त्रक्रिया पार पाडली. त्यांचा हा विक्रम पाहून २००८ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री बहाल केली. एका सरकारी रुग्णालयाला अत्याधुनिक आणि आरोग्य यंत्रणेला रुग्णाभिमुख करण्याचं आव्हान त्यांनी यशस्वीरीत्या स्वीकारलं आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या प्रत्येक कार्यामागे एक वेगळा दृष्टिकोन आहे.
पदमश्री डॉ.तात्याराव लहाने
१९८१ : मराठवाडा विद्यापीठातून वैद्यकीय पदवी.
१९८५ : ऑप्थोमाॅलाजीमध्ये एम.बी.बी.एस.
१९९४ : जे.जे. रुग्णालयाच्या नेत्रचिकित्सा विभाग प्रमुख पदावर नियुक्ती.
२००४ : जे.जे मध्ये रेटिना विभागाची सुरुवात.
२००७ : मोतीबिंदूवरील एक लाख शस्त्रक्रिया यशस्वी.
२००८ : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित. २०१० : जे.जे रुग्णालयाचे अधिष्ठाता पद.