
छत्रपती संभाजीनगरजवळील खुल्ताबाद येथे भद्र मारुती हे एक प्राचीन मंदिर आहे. वेरुळ लेण्यांपासून चार किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. येथील मारूती नवसाला पावणारा असून हे अत्यंत जागृत स्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. वैशिष्ट्य म्हणजे येथील मूर्ती शयनावस्थेत आहे. प्रयागराज येथील मंदिर आणि मध्य प्रदेशातील ‘जाम सवाली’ येथील मंदिरात अशी मूर्ती दिसते. हनुमान जयंती, चैत्र पौर्णिमा, रोजचा सूर्योदय व राम नवमीला येथे भाविकांची गर्दी असते.
या मंदिराबाबत एक कथा सांगितली जाते. भद्रावती येथे भद्रसेन नावाचा एक राजा होऊन गेला. त्याची रामावर विशेष प्रीती होती. तो नेहमी रामाची गाणी गात असे. एकदा हनुमान आकाशातून जात असतांना त्यांच्या कानावर ही गाणी पडली. ते उतरले. गाणी ऐकण्यात तल्लीन झाले. तेथेच त्यांना ‘भाव समाधी’ लागली, असे सांगतात. राजा भद्रसेनांचे गाणे सपल्यावर त्यांनी पाहिले असता त्यांना मंत्रमुग्ध झालेले हनुमान दिसले. त्यांनी दंडवत घातला. भक्तांना दर्शन व आशीर्वाद देण्यासाठी तेथेच राहण्याची विनंती केली. त्याप्रमाणे हनुमान कायमचे तेथेच राहिले, असे सांगतात.
हे मंदिर प्रसन्नता प्रदान करणारे आहे. औरंगाबादमध्ये भेट देण्याच्या सर्वोत्तम स्थळांपैकी एक आहे, येथे सकाळी 5 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 9 पर्यंत प्रवेश दिला जातो. अनेक पर्यटक या निसर्गरम्य ठिकाणी आवर्जून भेट देतात. हे मंदिर, मूर्ती पाहून हरखून जातात.