
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद किल्ला हे एक आश्चर्यच मानले जाते. ह्याला औरंगाबादमध्ये ‘औरंगाबाद किल्ला’ असेही म्हटले जाते. या किल्ल्याचे पहिले नाव दौलताबाद नसून ‘देवगिरी’ असे होते. महंमद बिन तुघलक या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरी किल्ल्यावर स्थलांतरित केली. त्यावेळी त्याने देवगिरीचे नाव बदलून ‘दौलताबाद’ असे केले. हा किल्ला संभाजीनगरच्या मुख्य शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. ह्याला एक प्राचीन तटबंदी आहे. या किल्ल्यावरून संपूर्ण शहराचे विलोभनीय दृश्य दिसते. प्रचंड मजबूत तटबंदी, भुयारी मार्ग, खंड असलेले कडे आहेत. देवगिरीचा अर्थ ‘देवांचा डोंगर’ असा होतो. या किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांना ७५० पायऱ्या चढून जावे लागते. काही इतिहासकार म्हणतात की, वेरूळ येथील विश्वविख्यात कैलास लेण्यांचे निर्माते राष्ट्रकूट राजे होते. दिल्लीत स्थापन झालेल्या मुसलमानी दक्षिणेकडील भागात केलेली पहिलीच मोहीम ही देवगिरी किल्ल्यावरील होती.
दौलताबाद किल्ला हा उंच टेकड्यांवर बांधलेला सुरक्षित आणि शक्तिशाली किल्ला आहे. या किल्ल्याच्या मुख्य दरवाजाला महाकोट दरवाजा असे म्हणतात. सध्या पर्यटक या दरवाजाने किल्ल्यात प्रवेश करतात. या किल्यावर हिंदू आणि मुस्लिम धर्माशी संबंधित स्मारके पहायला मिळतात. या किल्ल्यात प्रवेश केल्यावर मोठा बुरुज दिसतो. या किल्ल्याच्या एका भागात भारतमाता मंदिर, तसेच पाण्याचा मोठा तलाव पहायला मिळतो. येथील निसर्गरम्यता, देवगिरी किल्ल्याची वास्तू आणि तेथील कोरीवकाम मन मोहीत करतात. अभेद्य भुईकोटामुळे देवगिरी किल्ला दुर्गम आहे. सर्वात बाहेरील तटबंदीला अंबरकोट म्हणतात. या अंबरकोटाला सात प्रचंड दरवाजे आहेत. अंबरकोटाचा विस्तार फार मोठा आहे. अंबरकोटाच्या आत महाकोट आणि महाकोटाच्या आतमध्ये कालाकोट आहे. महाकोटाच्या दरवाजाला असलेल्या लाकडी महाद्वारामधून आत प्रवेश केल्यावर बंदिस्त चौकात पहारेकऱ्यांसाठी देवडे आहेत.
या चौकामध्ये गाड्या, गाड्यांवरील तोफा व पंचधातूंच्या अनेक तोफा पहायला मिळतात. या किल्ल्यावर अनेक पाण्याच्या टाक्या आणि जलाशय आहेत. दरवाजे सरळ रेषेत नसल्यामुळे हत्तीला पळता येत नसे. किल्ल्याचा भुईकोट भाग संपून बालेकिल्ल्यात जाताना खोल खंदक आहे. या खंदकात पाणी असून त्यात मगरी असत. त्यामुळे खाली पडलेला शत्रू जिवंत राहू शकत नसे. खंदक ओलांडल्यानंतर अंधारी मार्ग आढळतो. या मार्गास लोक ‘आंधारी’ म्हणतात. किल्ल्याच्या पश्चिम दिशेस डोंगरात कोरलेले रासाई मातेचे मंदिर असून तेथून किल्ला फार सुंदर दिसतो.