मोलमजुरी ते सीईओ – ज्योती रेड्डी

सन १९८९ पर्यंत पाच रुपये रोजाने मोलमजुरी करणाऱ्या आणि आज सीईओ असलेल्या ज्योती रेड्डी यांचा यशोशिखरापर्यंतचा प्रवास करणारा आहे.

अमेरिकेतील कीज सॉफ्टवेअर सोल्युशन्स या कंपनीच्या थक्क करणारा तर आहेच, परंतु हे शब्द तंतोतंत खरे

‘एव्हरी सक्सेसफुल स्टोरी हॅज अ पेनफूल बिगिनिंग ॲण्ड एव्हरी पेनफूल बिगिनिंग हॅज अ सक्सेसफुल एण्डिंग.’

हे प्रेरणादायी शब्द आहेत माजी राष्ट्रपती मिसाइल मॅन डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे. हे केवळ एखादे विधान किंवा जीवनाचे तत्त्वज्ञान नसून, तुमच्या मनात प्रश्नाचे जे काहूर उठते त्याला मिळालेले भयप्रद, कनवाळू, सुखदायक आणि विदवत्तापूर्ण उत्तर असते. जीवनाच्या प्रारंभीच्या टप्प्यात ज्या वेदना किंवा धक्के सहन करावे लागतात त्याला दिलेला तो योग्य आणि अचूक प्रतिसाद असतो. ‘नो पेन्स, नो गेन्स’ म्हटले जाते ते उगाचच नव्हे, कोणताही मनुष्य जन्माला येत असताना त्याच्या मातेलाही प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात. म्हणजेच जन्मापासूनच हा प्रवास सुरू होत असतो. ‘जर तुम्ही गरीब कुटुंबात जन्माला आला, तर ती तुमची चूक नसते. मात्र, तुम्ही गरीब म्हणूनच जग सोडून गेलात तर ती तुमची चूक असते’, असे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी म्हटले आहे.

आज ज्योती रेड्डी प्रचंड पैसा कमावत असल्या तरी भारतीय समाजातील तळागाळाशी असलेली आपली नाळ त्यांनी अजूनही तुटू दिली नाही. हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. ज्योती रेड्डी यांचा आतापर्यंतचा प्रवास विस्मयकारक आणि थोड्याफार अडचणी आल्यामुळे खचून जाण्यासाठी खरोखरच प्रेरणादायी आहे. ‘शून्यातून विश्व निर्माण करणे’, हे वाक्य ज्योती रेड्डी यांनी सार्थकी लावले आहे. यशाच्या शिखरावर जाण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो त्या शिखरापर्यंतच्या प्रवासात अनेक खाचखळगे आणि विघ्नं येतात. परंतु, त्या सर्व आव्हांनावर मात करूनच तिथे पोचावे लागते.

शेतात मोलमजुरी करणाऱ्या एक साधारण महिलेने केवळ कौटुंबिकच नव्हे, तर आर्थिक अडचणींवर मात करून आपले स्वप्न कसे साकारले, हे जाणून घेणे खूपच प्रेरणादायी आहे. १५ दशलक्ष डॉलर्सच्या आयटी कंपनीच्या सीईओ ज्योती रेड्डी यांनी आपले यश स्वत: किंवा कुटुंबापुरते मर्यादित ठेवले नाही. एवढे यश संपादन केल्यानंतरही पाय जमिनीवरच ठेवत आज त्या आपली सामाजिक जबाबदारीही तेवढीच गांभीर्याने पार पाडत आहेत. ज्योती रेड्डी यांच्या यशस्वी प्रवासाचा विचार करायचा झाल्यास त्या जी आर्थिक मदत करतात तो फार मोठा मुद्दा नसून, असंख्य लोकांना आव्हानांचा सामना जिगरबाजपणे कसा करायचा, याची प्रेरणा त्यांच्यापासून मिळते.

आता अनेक महिला ज्योती रेड्डी यांना आदर्श मानून वाटचाल करत आहेत. या महिला आपली क्षमता ओळखून ज्योतीसारखे यश मिळविण्याचा प्रयत्न करताहेत. ज्योतीने आज जे यश मिळविले आहे त्याचा प्रवास जाणून घेतल्यास बहुतांश लोकांच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत.

अनिला ज्योती रेड्डी यांचा जन्म वारंगल जिल्ह्यातील हनुमाकोंडा येथे झाला. आणिबाणीच्या काळात रोजगार गमावलेल्या एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेली ज्योती ही चार भावंडांपैकी सर्वात मोठी. तिचे वडील नंतर लष्करात दाखल झाले. परंतु, कुटुंबाच्या आकर्षणामुळे ते फार काळ टिकू शकले नाही. परंतु त्यांनी जे लष्करी प्रशिक्षण घेतले, त्यातून त्यांचा जो दृष्टिकोन विकसित झाला तो वारसा म्हणून ज्योतीला मिळाला. ज्योतीच्या कुटुंबाला दोनवेळचे जेवणही सहजासहजी नशिबात नव्हते. त्यामुळे त्यांना नाईलाजाने ज्योतीला हनुमाकोंडा येथील बालसदनात टाकावे लागले.

इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत ज्योती कुटुंबापासून दूर बालसदनात राहिली. कुणीतरी येईल आणि आपली मदत करेल, या आशेवर ती दिवस काढत होती. विशेष करून हिवाळ्याच्या दिवसांमध्ये, कारण तिचे ब्लँकेट फाटलेले असल्यामुळे खूप थंडी वाजायची. बहुदा असे दिवस काढल्यामुळे तिला ती आत्मशक्ती मिळाली असावी. ज्योती दर उन्हाळ्यात आपल्या गावी जात असे. बालसदनात असताना ज्योती वॉर्डनच्या घरात राहायची आणि घरकाम केल्यानंतर तिला तिथे जेवण मिळत असे.

ज्योतीने दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. शिक्षण पुढे सुरू ठेवण्याची तिची खूप इच्छा होती. परंतु, तिच्या मातापित्याच्या मनात काही वेगळेच होते.

ज्योती अवघी 16 वर्षांची असतांना हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे पालकांनी संगा रेड्डी यांच्याशी तिचा विवाह लावून दिला. देशाच्या ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी अशीच स्थिती आहे. मातापिता मुलीला ओझं समजतात आणि शक्य तेवढ्या लवकर विवाह करून हे ओझं हलकं करण्याचा त्याचा प्रयत्न असतो विवाह झाला त्यावेळी ज्योती अबोध होती. आणि वैवाहिक जीवनाबद्दल तिला काहीच कल्पना नव्हती. काळ पुढे सरकत गेला. १८ व्या वर्षी ज्योती दोन मुलींची आई झाली. मात्र दोन्ही मुलींच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे आणि देखभाल करणेदेखील तिला शक्य होत नव्हते.

मात्र, ‘व्हेन देअर इज अ विल, देअर इज अ वे’, याप्रमाणे मुलीच्या गरजा भागविण्यासाठी तिने सासू आणि पतीसोबत शेतात मोलमजुरी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिला पाच रुपये रोजी मिळत होती. परंतु, ज्योती ज्या निष्ठेने शेतात काम करायची त्यामुळे तिच्यासोबत काम करणारे अनेक जण प्रभावित झाले. या तिच्या वृत्तीमुळेच शेतीमधील बारीकसारीक गोष्टी तिला जाणून घेता आल्या. १९८६ ते १९८९ अशी तीन वर्ष ज्योतीने शेतात मोलमजुरी केली. परंतु, १९८९ मध्ये अचानक तिच्या जीवनाला कलाटणी मिळाली.

प्रौढांना पायाभूत शिक्षण देण्यासाठी नेहरू-युवक केंद्राने गावी एक रात्रशाळा सुरु केली. गावात कुणीही पदवीधर नव्हते आणि ज्योती हा एकच पर्याय असल्याने केंद्राने ही जबाबदारी तिच्या खांद्यावर सोपविली. याचे तिला दरमहा १५० रुपये देण्याचे निश्चित झाले. ज्योती शेतात मोलमजुरी करणाऱ्या सर्वांना सायंकाळी केद्रात आणत असे आणि अनोख्या पद्धतीने त्यांना मूलभूत शिक्षण देण्यास तिने सुरुवात केली. ज्योती ज्या अनोख्या आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने शिकवत  होती. त्यामुळे केंद्र संचालक खूपच खुश झाले आणि तिची हनुमाकोडा येथे मंडल प्रेरक म्हणून नियुक्ती झाली.

मंडल प्रेरक या नात्याने वारंगल जिल्ह्यातील सर्व केंद्रांना तिला भेट द्यावी लागे. यादरम्यान तिला शिक्षणाचे महत्त्व पटू लागले आणि उच्च शिक्षणाशिवाय आपण जीवनात पुढे काहीच करू शकणार नाही, याची तिला जाणीव झाली, हे काम करत असतानाच ज्योतीने आंबेडकर खुल्या विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाबाबत तिची उत्कट इच्छा बघून विद्यापीठातील अधिकारीदेखील प्रभावित झाले. त्यानंतर ज्योतीने अण्णा युनिव्हर्सिटीमधून बी.एड. केले आणि सरकारी शिक्षिका झाली. परंतु, यानंतरही तिच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. तिला कुटुंब आणि समाजात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पती आणि मुलींसह गाव सोडून कामाच्या ठिकाणी राहणे आणि काम, घर यांचे संतुलन साधताना आर्थिक चणचण भासत असल्यामुळे तिला कमाईचे दुसरे पर्यायदेखील शोधावे लागले. ग्रामीण भारतातील जवळपास प्रत्येक महिलेला एव्हरेस्टपेक्षाही मोठ्या असलेल्या या अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, या अडचणीमुळे डगमगून न जाता यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी ज्योतीमध्ये असलेल्या उर्जेमागे संयम, चिकाटी आणि कटिबद्धता या गुणांचे फार मोठे योगदान आहे.

इथे ज्योतीच्या वेदना संपल्या असे जर वाटत असेल तर त्यात प्रेरणादायी काहीच नाही, असे म्हणावे लागेल. ज्योती विविध शाळांची निरीक्षक म्हणून काम करत असताना अमेरिकेत स्थायिक झालेली तिची एक नातेवाईक गावी आली. ती गावात असेपर्यंत ज्योती तिच्यासोबत होती आणि या काळात तिच्या जीवनशैलीत झालेला बदल तिने जाणून घेतला. ज्याप्रकारे तिची अमेरिकेतील नातेवाईक आपल्या मुलींवर पैसा खर्च करत होती ते बघून अपल्या मुलींनाही या गोष्टी मिळाव्या, असे तिला मनापासून वाटू लागले. अमेरिकेत जाऊन पैसा कमावला तर आपल्या मुलींचेही भविष्य उज्ज्वल करता येऊ शकते. असाही विचार तिच्या मनाला स्पर्श करून गेला. तुझ्यासारखी आक्रमक महिला अमेरिकेत सहज स्थायिक होऊ शकते, असे तिने ज्योतीला सांगितले. झाले, ज्योतीने यापासून प्रेरणा घेत त्या दिशेने वाटचाल सुरू केली, जराही वेळ न दवडता तिने कॉम्प्युटर  सॉफ्टवेअरच्या क्लासेससाठी नोंदणी केली. पत्नीने बाहेर राहू नये असे पतीला वाटत असल्यामुळे ज्योतीला दररोज हैदराबाद येथे येणेजाणे करावे लागत असे. अमेरिकेला जाण्याचा जणू निर्धारच तिने केला होता. परंतु, पतीला यासाठी तयार करताकरता तिच्या नाकी नऊ आले. स्वत:ची कार हे ज्योतीचे सर्वात मोठे स्वप्न होते आणि अमेरिकेत जाऊनच ते पूर्ण होऊ शकते, असेच तिला वाटायचे. म्हणूनच तिने व्हिसा आणि पासपोर्टसाठी पैसाही जमविण्यास सुरुवात केली. प्रारंभी तिला अनेकदा अपयश आले, मात्र, ‘प्रयत्नांती परमेश्वर’ याप्रमाणे अखेर तिला प्रवासी व्हिसा मिळाला. थोडाफार पैसा आणि स्वप्नांच्या तिजोरीसह तिने अमेरिकेकडे प्रयाण केले.

अमेरिकेच्या भूमीवर उतरताच त्याठिकाणी स्थायिक होणे वाटते तेवढे सोपे नाही, याची जाणीव तिला लगेचच झाली. आपल्याला जे लोक आसरा देतील, अशी ज्योतीला अपेक्षा होती त्यांनीच नेमकी पाठ फिरविली. सोबत आणलेला पैसा संपत आला होता. म्हणून तिने न्यूजर्सी येथील एका व्हिडिओ शॉपमध्ये सेल्सपर्सन म्हणून नोकरी पत्करली. त्यावेळी ती एका गुजराती कुटुंबाकडे पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. या शॉपमध्ये काम करत असतानाच वारंगल भागातीलच एका भारतीयाने तिला बघितले आणि आपल्या भावाच्या कंपनीत नोकरीसाठी तिची शिफारस केली. प्रारंभिक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला नोकरी मिळाली. त्यानंतर आयसीएसए या प्रख्यात कंपनीने तिला आकर्षक वेतनासह नोकरीचा प्रस्ताव दिला. परंतु, व्हिसाला मान्यता नसल्यामुळे पुन्हा ज्योतीला अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे तिने एच-१ व्हिसासाठी अर्ज केला. यासाठी तिला आयसीएसएची नोकरी सोडावी लागली व एच-१ व्हिसा मिळेपर्यंत पाच डॉलर्स प्रतितास याप्रमाणे काम करावे लागले.व्हिसा स्टॅम्पिंगसाठी ज्योती मेक्सिकोला गेली. व्हिसा मिळण्यासाठी जे दिव्य पार करावे लागले त्याकडे बघता स्वतःचा व्यवसाय सुरू करून इतरांना व्हिसा मिळण्यासाठी मदत करण्याचा विचार प्रथमच तिच्या मनात आला आणि त्याच ठिकाणी कीज सॉफ्टवेअरची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. हळूहळू ज्योतीने सॉफ्टवेअर सोल्युशन्स देण्यासह रिक्रुटेंमट आणि इतर मदतही उपलब्ध करून दिली. मे २००० मध्ये ज्योती अमेरिकेत आली आणि २००१ साली ती व्यावसायिकसुद्धा झाली. आपल्या एका नातेवाईकालाच तिने भागीदार बनविले.

अशाप्रकारे कठोर मेहनत, कटिबद्धता आणि निष्ठा या जोरावर ज्योतीने आपल्या स्वप्नांना पंख देत यशोशिखर गाठले, आपली मुलं आणि इतर नातेवाईकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, इतके पैसे तिने कमावले आहेत. तिच्या दोन्ही मुलींनी अमेरिकेतन प्रतिष्ठित विद्यापीठांमधून उच्च शिक्षण घेतले. सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या दोन्ही मुली विवाह करून अमेरिकेत स्थायिक झाल्या. आपल्या मुलींना चांगले जीवन जगता येईल हे सुनिश्चित करण्याचे ज्योतीचे स्वप्न साकार झाले. मुलीदेखील खूप मेहनती आहेत आणि वेळ मुळीच वाया घालवत नाहीत, असे ती अभिमानाने सांगते. आज ज्योतीकडे शूज आणि चपलांचे २०० जोड आहेत ड्रेसवर मॅच होईल अशी जोडी शोधण्यासाठी तिला १५ ते २० मिनिटे लागतात. प्रारंभी माझ्याकडे फक्त दोनच साड्या होत्या. तिसरी साडी घेण्यासाठी मला खूप कष्ट करावे लागले आणि १३५ रुपयांची ती तिसरी साडी आजही जपून ठेवली आहे, असे ती सांगते. तिच्या लहान मुलीच्या विवाहासाठी ज्योतीने १.६० लाख रुपयांची निळ्या रंगाची साडी खरेदी केली. ज्योतीची अमेरिकेत सहा आणि भारतात दोन घरे आहेत. स्वत:ची कार चालविण्याचे तिचे स्वप्न पूर्ण झाले असून, ती मर्सिडिज बैंजमधून फिरते. डोळ्यावर गॉगल आणि केस मोकळे असतात.

वारंगलच्या खेड्यापासून ते अमेरिकेपर्यंतच्या प्रवासात ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांना ती धन्यवाद देते आणि इथपर्यंतच्या वाटचालीत सहन कराव्या लागलेल्या वेदना ती कधीही विसरत नाही. त्यामुळेच तिने गरजू लोकांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला. प्रतिकूल परिस्थितीचा सामना कराव्या लागणाऱ्या मुलांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचा ज्योतीचा निर्धार आहे. याच उच्च विचारांमुळे मानवतेची सेवा करण्याची तिची इच्छाशक्ती जागृत होते.

एक महिला आपल्या मेहनतीच्या जोरावर अमेरिकेला गेली, खूप पैसा कमावला आणि लोकांनी त्याला यश म्हणावे, एवढ्यापुरतीच ही गोष्ट मर्यादित नाही. ज्योतीचा दृष्टिकोन आणि साधेपणा यामुळे लोकांनी तिला जवळ केले, ज्योती आपले मूळ कधीही विसरली नाही. जेव्हा जेव्हा ती भारतात येते तेव्हा ती बालसदन, वृद्धाश्रमांना भेट देते आणि त्यांच्यासोबत वेळ घालवते. त्याठिकाणी असलेल्यांना आर्थिक मदत करते. महिला महाविद्यालयांना भेटी देऊन इतरांना प्रेरित करण्याचाही तिचा प्रयत्न असतो. आज जे काही यश मिळविले ते डोक्यात न जाऊ देता ज्योतीने हृदयात साचवून ठेवले आहे. प्रारंभीच्या काळात आसरा आणि मार्गदर्शन करून अनेक भारतीयांना अमेरिकेत स्थायिक होण्यास ज्योतीने मदत केली आहे.

ज्योती रेड्डीची ही अद्‌भुत कहाणी खरोखरच प्रेरणादायी आहे. डॉ.एपीजे अब्दुल कलाम हे ज्योतीचे प्रेरणास्थान होते. वयाच्या ११ ते १६ वर्षादरम्यान मुलगा किंवा मुलगी आपले व्यक्तिमत्व घडवत असतो, असे डॉ. कलाम यांचे शब्द आजही तिच्या कानावर पडतात. ज्योतीचा हा प्रवास इतरांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. अडचणी आल्या तरी खचून न जाता मेहनत व निष्ठेने काम करत राहा, यश हमखास मिळते, हाच संदेश ज्योतीच्या जीवनप्रवासातून मिळतो!