तामिळनाडू – केरळला अतिवृष्टीचा इशारा

उत्तर भारत थंडीच्या विळख्यात असताना, दक्षिणेकडील राज्ये, विशेषत: तामिळनाडू आणि केरळ या राज्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या भागात ईशान्य मोसमी पाऊस सक्रिय झाल्यामुळे वादळी वाऱ्यासह  जोरदार पाऊस अपेक्षित आहे.

भारतीय हवामान खात्याने तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल येथे विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस अपेक्षित आहे. तर बारा ते तेरा नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे. तर केरळमध्ये देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

ईशान्येकडील मोसमी वाऱ्यांशी संबंधित आर्द्रतायुक्त पूर्व वाऱ्यांमुळे द्वीपकल्पीय भारतामध्ये पावसाचा हा जोर कायम राहणार आहे. हवामान विभागाने, दक्षिण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमधील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर वाढल्यास स्थानिक पातळीवर पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. चेन्नई, कुड्डालोर, नागपट्टणम, पुडुचेरी आणि कराईकलच्या काही भागांना या आठवड्याच्या शेवटी जोरदार पावसाचा अनुभव येऊ शकतो. त्याचप्रमाणे केरळच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्येही पावसाच्या तीव्र आणि कमी कालावधीच्या सरी अपेक्षित आहेत. आजकेरळ, माहे, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल येथे काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. याच भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस अपेक्षित आहे. बारा नोव्हेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडेल. त्यानंतर चौदा नोव्हेंबरला हवामान सुधारण्याची अपेक्षा आहे.

हवामान विभागाने तामिळनाडू आणि केरळमधील किनारपट्टी भागातील नागरिकांना आणि मच्छिमारांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. अतिवृष्टी आणि वादळी पावसामुळे समुद्रात उंच लाटा निर्माण होऊ शकतात. त्यामुळे बंगालचा उपसागर आणि लगतच्या किनारपट्टीच्या पाण्यात जाणाऱ्यांना स्थानिक हवामानाचा अंदाज घेऊन प्रवास करण्याचे आणि धोकादायक परिस्थितीत प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवाशांनीही दक्षता घेणे आवश्यक आहे. मदुराई, रामेश्वरम, कोची आणि तिरुवनंतपुरमसारख्या दक्षिणेकडील पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या प्रवाशांना सावधगिरीने नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे. अधूनमधून पडणाऱ्या जोरदार सरींमुळे रस्ते आणि हवाई वाहतुकीत व्यत्यय येऊ शकतो.






22,693 वेळा पाहिलं