
आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाच्या घटनांनी जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे दोन्ही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे.
राज्यातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये सुमारे तीन लाख लोक पूरग्रस्त झाले आहेत. कछार जिल्ह्यात सर्वाधिक एक लाख नागरिक प्रभावित झाले असून, दहा हजार हून अधिक लोकांना मदत छावण्यांमध्ये आश्रय देण्यात आला आहे. गुवाहाटी शहरात भूस्खलनामुळे एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील विविध भागांमध्ये एकूण सोळा जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

पूर्व कामेंग जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग तेरावर भूस्खलनात एक वाहन दरीत कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. इतर भागांमध्येही भूस्खलन आणि पूरामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांची संख्या नऊ वर पोहोचली आहे. अरुणाचल प्रदेशच्या लोअर दिबांग व्हॅली जिल्ह्यात पुरामुळे अडकलेल्या चौदा नागरिकांना वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर केली आहे. राज्य प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. भारतीय हवामान विभागाने आसाम, मेघालय, नागालँड, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अरुणाचल प्रदेशातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.