जया एकादशी

वारकरी बांधवांसाठी एकादशीचा दिवस हा कोणत्याही मोठ्या सणांपेक्षा निश्चितच लाहान नसतो. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात एकादशी येते. तिला ‘जया एकादशी’ असे म्हणतात. यावर्षी जया एकादशी 20 फेब्रुवारीला आहे. ही एकादशी अत्यंत शुभ मानली जाते. या एकादशीचे व्रत केल्यास सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते. श्रद्धेनुसार जो भक्त खऱ्या भक्तिभावाने जया एकादशीचे व्रत करतो त्याला अगणित पुण्य प्राप्त होते. यादिवशी भगवान विष्णूची पूजा करावी. त्यामुळे सकल दोषांपासून मुक्ती मिळते. ही पूजा करताना जया एकादशी व्रताची कथा वाचल्याने सौभाग्य प्राप्त होते.

आख्यायिकेनुसार, धर्मराजा युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांना माघ महिन्याच्या एकादशीचे महत्त्व काय, असा प्रश्न विचारतात. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, या एकादशीचे व्रत केल्याने माणसाला भूत-प्रेतांचे भय राहत नाही. मग भगवान श्रीकृष्ण कथा सांगतात. एकदा नंदनवनात एक उत्सव चालू होता. या उत्सवास सर्व देव, सिद्धहस्त संत, दिव्यपुरुष उपस्थित होते. या उत्सवी कार्यक्रमात गंधर्व गात होते आणि गंधर्व मुली नाचत होत्या. त्याचवेळी सभेत गात असलेल्या मल्यवन नावाच्या गंधर्वावर नर्तकी पुष्पावती मोहित झाली. मल्यवन तिच्याकडे आकर्षित झाला. त्याने संवेदना गमावल्या आणि सूर विसरला, ज्यामुळे तो गाण्याच्या प्रतिष्ठेपासून विचलित झाला.

यामुळे देवराज इंद्र संतापला. ते दोघेही स्वर्गापासून वंचित राहतील. आणि त्यांना पृथ्वीवरील पिशाचाचे सर्वात खालचे रूप मिळेल, असा शाप इंद्राने दिला. शापाच्या प्रभावामुळे ते दोघेही भूत बनले. हिमालय पर्वतातील एका झाडावर अत्यंत वेदना सहन करू लागले. एक दिवस दोघेही अत्यंत दुःखी झाले होते. त्यांनी फक्त फळे खाल्ली. त्याच रात्री थंडीमुळे दोघांचा मृत्यू झाला. योगायोगाने त्यादिवशी माघ शुक्ल पक्षातील एकादशी तिथी होती. अशा प्रकारे नकळतपणे एकादशीचे व्रत केल्यामुळे दोघांना पिशाच रूपापासून मुक्ती मिळाली. त्यानंतर ते पूर्वीपेक्षा अधिक सुंदर झाले. त्यांना पुन्हा स्वर्गात स्थान मिळाले. त्या दोघांना पाहून देवराज इंद्र आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले की, ते शापातून कसे मुक्त झाले ? ज्यावर गंधर्वांनी सांगितले की, हा भगवान विष्णूच्या जया एकादशीचा प्रभाव आहे.