कोल्हापुरचा कणेरी मठ

देवीच्या साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीचे वास्तव्य असलेले करवीरनगरी अर्थात कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक देखणे पर्यटनस्थळ आहे. हे शहर पंचगंगा नदीच्या काठावर असून भोवताली सह्याद्री पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. जवळपास सर्वच क्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्याचा नावलौकिंक आहे. या कोल्हापूर शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर ‘कणेरी’ हे जगप्रसिद्ध गाव आहे. आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिकद्ष्ट्या या स्थळाचे मोठे महत्त्व आहे. या गावात काडसिद्ध संप्रदायाचे मूळ स्थान असलेला कणेरी मठ आहे. ‘जगद्गुरू काडसिद्धेश्वरांचा मठ’ अशी याची ओळख आहे. या मठात जाणे म्हणजे केवळ दर्शन घेऊन येणे, एवढ्यापर्यंतच स्तिमीत नसते. तर येथे जाणारा पर्यटक, मग त्याला कोणत्याही क्षेत्रातील अभिरुची असो, तो मागे फिरताना तृप्तता घेऊनच येतो. या मठाला प्राचीन परंपरा आहे. हे अत्यंत पुरातन, धार्मिक व आध्यात्मिक पीठ आहे. कणेरी गावातील घनदाट अरण्यात एक शिवपिंडी तसेच सिद्धेश्वरांचे देवालय आहे. या मंदिराभोवती आणखी काही छोटी देवालये आहेत.

जगद्गुरू काडसिद्धेश्वर मठ म्हणजे हेमांडपंथी शिल्पकलेचा नमुना असलेले भव्य शिवमंदिर आहे. हे मंदिरही फारच सुंदर आहे. मोठ्या दगडात हे मंदिर बांधले आहे. हा संस्थान मठ सुमारे तीनशे एकरात पसरलेला आहे. येथे एक जलमंदिरही आहे. येथे पंचकर्म चिकित्सालय असून जुन्या व असाध्य अशा आजारांवर इलाज करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्म पद्धतीने उपचार केले जातात.क्राँक्रीटचे दोन महाकाय हत्ती, महाकाय नंदी व पिंडीच्या आकाराच्या छोट्या मंदिरावर 25 फूट उंचीची शंकराची मूर्ती फारच लक्षवेधक आहे. या मठात भक्तनिवास आहे. पर्यटकांसाठी येथे सिद्धगिरी उद्यान स्थापन करण्यात आले आहे. तेथे सिद्धगिरी संग्रहालय, ग्रामीण जीवन संग्रहालय, शिव शंकराचे प्राचीन मंदिर, त्याचबरोबर भारताच्या प्राचीन जीवनशैलीची ओळख करून देणारे शिल्पग्राम पाहता येते. भारतीय ग्रामीण जीवनातील बलुतेदारी आता संपुष्टात आली; परंतु एक काळ असा होता बलुतेदारी हा जीवनाचा अविभाज्य भाग होता. ती बलुतेदारी येथे पाहता येते. मुलांना त्याचे दर्शन घडवून आणता येते. येथे प्रशस्त अशी वाहनतळ व्यवस्था आहे. या मठात देशी गोवंशाचे पालन केले जाते. यामध्ये विविध जातींच्या गाई आहेत. या मठात गेल्यावर प्राण्यांची उत्कृष्ट शिल्पेही पहायला मिळतात. अगदी मुंग्यांपासून हत्तीपर्यंतची शिल्पे अक्षरश: जिवंत वाटतात.

विहिरीवर पाणी आणण्यास जाणाऱ्या, जात्यावर दळण दळणाऱ्या महिला अशी अनेक देखणी शिल्पे पाहून जुना काळ आठवतो. लहान मुलांच्या विरंगुळ्यासाठीही येथे अनेक आकर्षणे पहायला मिळतात. येथे पंढरीची वारीसुद्धा पाहता येते. मुर्तींमध्ये इतका जिवंतपणा आहे, की मूर्तीतील खरेखोटेपणा हात लावल्याशिवाय कळत नाही. कणेरी मठात प्रत्यक्ष काम करणारे कारागीरही दिसतात. ग्रामीण भागातील घरांचे विविध नमुने येथे पहावयास मिळतात. वतनदाराचा वाडा, पाटलाचा वाडा यांच्या हुबेहूब प्रतिमा येथे आहेत. दोन्ही बाजूंना हिरवीगार शेते आणि त्यात काम करणाऱ्या माणसांचे पुतळे येथे आहेत. शेतीप्रक्रियेतील प्रत्येक कृती येथे सजीवरुपात साकारली आहे.

सिद्धगिरी वस्तू संग्रहालय सुमारे दहा एकरावर आहे. आशिया खंडातील पहिल्या दहा वस्तू संग्रहालयामध्ये याचा समावेश होतो. या वस्तुसंग्रहालयाच्या सुरुवातीला बारा राशींची बारा शिल्पे आहेत. त्यानंतर भारताची प्राचीन ऋषि परंपरा पुतळ्यांच्या स्वरूपात पहावयास मिळते. प्राचीन भारतातील ऋषीमुनींचे सिमेंट काँक्रेटमध्ये तयार केलेले कोरीव पुतळे येथे पहायला मिळतात. याशिवाय पारंपरिक खेळांचेही येथे दर्शन् घडविले जाते. खरोखरच, नेत्रसुख प्रदान करणाऱ्या या कोल्हापुरातील कणेरी मठाला आवर्जून भेट द्यायलाच हवी.