
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीच्या रायगड~ या किल्ल्याच्या लगत असलेले महाड एक शहर आहे. या शहराची लोकसंख्या 27,536 इतकी आहे. या शहराच्या मध्यभागी चवदारतळे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने या शहराची भुमी पावन झाली आहे. हे तळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या पाण्याच्या सत्याग्रहामुळे जागतिक स्तरावर प्रसिध्द आहे. या तळ्याचे अंदाजे क्षेत्रफ़ळ 2.5 एकर आहे.
अनेक पर्यटक दरवर्षी आवर्जुन या तळ्यास भेट देत असतात. महाड नगरपरिषदेने या चवदार तळ्याचे सौदर्यीकरण पूर्ण केले आहे. या तळ्याच्या सौदर्यीकरणाचे काम व या सौदर्यीकरणाचा उद्घाटन सोहळा दिनांक 2 जुन 1992 रोजी संपन्न झाला आहे. सद्यस्थितीत चवदारतळ्याच्या चारही बांजुंनी सुशोभित कठडे बांधण्यात आले आहेत. तळ्याच्या सभोवताली विजेचे खांब उभारुन त्यावर विद्युत दिवे लावण्यात आले आहेत. चवदार तळ्याच्या पश्चिमेकडील भिंतीपासुन सुमारे 100 फ़ुटावर पाण्यामध्ये चौथरा बांधला असून या चौथऱ्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा साडे दहा फ़ुट उंचीचा पुर्णाकृती ब्रॉझचा पुतळा उभारण्यात आला आहे.
त्याठिकाणी जाण्यासाठी पूल बांधण्यात आला आहे. पुतळ्याच्या चबुत-यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार कोरलेले आहेत.चवदार तळ्याच्या पश्चिमेकडे एक बहूउद्देशीय सभागृह बांधण्यात आले आहे. सभागृहाच्या तळमजल्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील महत्वाच्या घटनांबाबत स्मृतीचित्र आहे. या सभागृहाचा उपयोग विविध सभा, कार्यक्रम इ. साठी करण्यात येतो.
सभागृहाच्या पहिल्या मजल्यावर वाचनालय आहे. सभागृहाच्या समोरील जागेमध्ये आकर्षक बगीचा करण्यात आला आहे.महाड शहर ‘सावित्री’ नदीच्या किनारी वसलेले आहे. मुंबई ते महाड हे अंतर 175 कि.मी. आहे. पुणे ते महाड हे अंतर 110 कि.मी तर महाड ते किल्ले रायगड हे अंतर 24 कि.मी. आहे. या शहराच्या हद्दीलगत मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग आहे.