
यूपीएससी, एमपीएससीसारख्या स्पर्धा-परीक्षांमध्ये मराठी टक्का वाढला पाहिजे. देशातील या सर्वांत समर्थ यंत्रणेमध्ये मराठी अधिकाऱ्यांची संख्या वाढावी, या उद्देशाने काही प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची ओळख आपण ‘जिगरबाज ‘ या सदरातून करून घेणार आहोत. डॉ.भूषणकुमार उपाध्याय हे असंच एक प्रभावी व्यक्तिमत्त आहे.
सामान्यतः गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी पॉलिसांची एक मदत असते. त्या पद्धतीला सगळेच वचकून असतात, साम, दाम, दंड, भेद या न्यायाने पोलीस गुन्हेगाराला वठणीवर आणतात. पण गुन्हेगारी प्रवृत्तीला शिक्षेपेक्षा प्रबोधनाची साथ मिळावी तर समाजात चांगले बदल नक्की घडू शकतात, या विचारला आचरणात आणलं ते आयपीएस अधिकारी भूषणकुमार उपाध्याय यांनी, ते सध्या मुंबईच्या वाहतूक विभागाचे सह- पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
भूषणकुमार उपाध्याय यांचा जन्म बिहारमधील मोतिहारी येथे झाला. बालपणही तिथेच गेलं. वडील प्राध्यापक होते, त्यामुळे उपाध्याय यांची जडणघडण एका संस्कारशील वातावरणात झाली. साहित्याची आवड, घरात प्रवचनाची परंपरा यांचा परिणाम त्यांच्या विचारसरणीवरही पडला. मग संस्कृत साहित्यात पदवी संपादन करून त्यात पदव्युत्तर शिक्षणही त्यांनी पूर्ण केलं. प्राध्यापक होण्याची मनीषा असताना अगदी अपघातानेच त्यांच्या भविष्याला वेगळं वळण मिळालं. त्यांच्या वडिलांना एकदा पोलिसांनी अकारण त्रास दिला. नुकतेच पदवीधर झालेल्या उपाध्याय यांना ते खूप जिव्हारी लागलं. या अनुभवामुळे त्याना पोलीस यंत्रणेचा एक भाग होण्याची इच्छा जागृत झाली. त्यासाठी राष्ट्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा यशस्वीरीत्या पार करून उपाध्याय आयपीएस झाले.
सामान्यतः आयपीएस किंवा पोलिस अधिकारी म्हटला, की आपल्या डोळ्यासमोर आक्रमक, सैनिकी धाटणीच्या व्यक्तीचं चित्र उभं राहतं. पण उपाध्याय याला अपवाद आहेत. संस्कृतमध्ये पदव्युत्तर पदवी घेणारे उपाध्याय यांनी आपली पीएच.डी भाषाभिमान शास्त्रात केली. युपीएससीसाठी प्राथमिक परीक्षेत इतिहास तर मुख्य परीक्षेत संस्कृत आणि तत्वज्ञान हे विषय त्यांनी निवडले होते. त्यामुळे पोलिसी पेशातील अनेक लहानमोठ्या अडचणींवर यशस्वी मार्ग काढण्याचं कौश्यल्य त्यांना आत्मसात झालं. गुन्हेगारापेक्षा गुन्हेगारी प्रवृत्ती अपराध्याला शासन करण्यापेक्षा त्याला सुधारण्याची संधी देणं, त्यासाठी त्याचं प्रबोधन करून प्रवृत्त करणं ही त्यांची पद्धत आहे. त्याचसोबत निरपराध्याला अकारण त्रास न होणंही त्यांना महत्त्वाचं वाटतं. त्यांचे हे विचार त्यांनी त्यांच्या कृतीतूनही दाखवून दिले आहेत.
आयपीएस झाल्यानंतर त्याचं पहिलं पोस्टिंग पंढरपूला होतं. इथला कार्यभार सांभाळतांना त्यांनी आपल्या कामाच्या आगळ्या शैलीमुळे लोकप्रियता मिळवली. तिचे ते त्यांचं कार्यालय ते विठ्ठलाच मंदिर हे अंतर अनवाणी चालून जात. आठड्यातून तीन-चार दिवस परिसरात साध्या वेशात फिरून अनेक लहान-मोठे गुन्हे होण्याला त्यांनी प्रतिबंध घातला. त्यांच्या अशा अनपेक्षित हजेरीमुळे वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती बसली. पंढरपुराल्या आध्यात्मिक वातावरणात ते चांगलेच रमले. इतकचं नव्हे, तर त्यांनी स्वतः पंढरपुरात प्रवचनही दिली आहेत. तिथून त्यांची बदली मग लातूरला झाली. ते वर्ष होतं १९९३. लातूरच्या भूकंपग्रस्त भागात त्यांनी तीन वर्ष काम केलं. मग जळगाव, सोलपवर, नागपूर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यात त्यांनी आपली कर्तव्यनिष्ठा दाखवली.
सामान्य माणसाच्या मनात पोलिसांबद्दल भीतीची भावना असते. याचं कारणंही ते स्पष्ट करतात. मुळात पोलिसांची यंत्रणा, त्यातले विभाग, त्यांची कामं ही ब्रिटिशांनी आपल्या सोयीसाठी बनवली. त्या काळात ते भारतीयांवर वचक ठेण्यासाठी पोलीस भरती करत. स्वातंत्र्यानंतर आपणही टी यंत्रणा होती तशी स्वीकारली. पण आज त्यात कालानुरूप बदल करण गरजेचं झालं आहे. बारा तासांची ड्युटी, विश्रांतीस्थान, स्वछतागृह याचा अभाव यामुळे पोलिसांवर खूप ताण पडतो. जशी पोलिसांची भरती करणं आवश्यक आहे तसंच त्यांच्या कामाचे नियोजन करणंही गरजेचं आहे. त्यांना मूलभूत सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत. परदेशात पोलिसांना फक्त सहा तासच ड्युटी असते. त्यातही कामाचं स्वरूप विभागलेलं असतं. आपल्याकडच्या पोलीस ट्रेनिंगमध्ये शारीरिक मेहनतीवर भर दिला जातो. खरं तर पोलिसांच्या शरीरासोबत मनाचंही ट्रेनिंग होणं गरजेचं असल्याचं उपाध्याय सांगतात.

वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांविषयी सामान्यांच्या मनात आस्था असते. पण तीच माणसं त्यांच्या हाताखालच्या पोलिसांना घाबरतात. याचं कारण त्यांच्या कामाचे तास आणि ताण. त्यामुळे पोलिसांच्या कामाचं नियोजन करताना नव्याने समावेश झालेल्या बाबींचा विचार करायला हवा. नार्कोटिक्स, दहशतवाद, ट्रॅफिक, व्हीआयपी सुरक्षा अशा विभागात मनुष्य बळाची वाटणी ही त्यांच्या अग्रक्रमाने व्हायला हवी. अशा नवीन प्रश्नांना सामोरं जाताना पोलिसांना कसरत करावी लागते. याशिवाय समाजात वाढणारी आंदोलनं, मोर्चे यामुळे सामाजिक तणाव निर्माण होतो. पण या समस्यांच्या तुलनेत पोलिसांचं मनुष्यबळ पुरेसे नाही. अर्थात त्यासाठीही त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत आणि गेल्या आठ-दहा वर्षात त्याला यशस्वी आले आहे. पोलीस दलात पन्नास हजार कर्मचाऱ्यांची भरती झाली आहे. अजूनही काही चांगले बदल घडून येण्यासाठी काही काळ जावा लागेल.
एखादं प्रश्न नेहमीच धाकदपटशाहीने न सोडवता शांततेने , समजूतदारपणाने सोडवला जाऊ शकतो. फक्त त्यासाठी तुमच्याकडे संकल्पशक्ती हवी. संकल्पशक्तीला कर्तृत्वाची जोड देऊन एखादा छोटा माणूसही मोठं कार्य करू शकतो. पोलिसांच्या बाबतीत म्हणाल तर त्यांच्याकडून केली जाणारी कारवाई ही त्या व्यक्तीच्या भल्यासाठी केली गेली पाहिजे, असं उपाध्याय यांचं मत आहे. गेले दोन तप याच तत्त्वाला समोर ठेऊन त्यांनी काम केलं आहे आणि अजूनही करत आहेत. त्यांनी आपल्या या तत्त्वांना शब्दरूप देऊन दोन पुस्तकही प्रकशित केली आहेत. नवीन भरती झालेल्या अनेक शिकाऊ पोलिसांना ते मार्गदर्शन करतात. शासनानेही त्यांच्या या अजोड सेवेची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित केले आहे. उपाध्याय यांचं मूळ गाव बिहार असलं तरी आज महाराष्ट्रात येऊन त्यांना वीस वर्षाहून अधिक काळ होऊन गेलाय. घरातून मिळालेल्या संस्कारशील वारसाला इकडच्या मातीत रुजविण्याच काम गेली दोन तप उपाध्याय करत आहेत. कार्यालयातही ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपेक्षा एका कसलेल्या गुरूच्या भूमिकेत असतात. त्यामुळे कोणीही माणूस त्यांच्याकडे निर्भयपणे व्यक्त होऊ शकतो.
महाराष्ट्राला कर्मभूमी मानून निवृत्तीनंतरही नागपूरमध्येच स्थायिक होण्याचा त्यांचा मानस आहे. कारण त्यांच्या घरच्या संस्कारांना महाराष्ट्रात पोषक वातावरण मिळालं आहे. त्याचं कर्तृत्व बहरून येण्यासाठी तेच महत्त्वाचं कारण असल्याचं उपाध्याय मानतात. त्यामुळे निवृत्तीनंतर प्राध्यापक म्हणून अपुरं राहिलेलं आपलं काम ते समाजप्रबोधनाच्या माध्यमातून पूर्ण करणार आहेत. त्यांची मुलगीही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत आयपीएस होण्याची तयारी करत आहे. स्पर्धा परीक्षा या फक्त दिसायला अवघड असतात. प्रत्यक्षात मात्र त्याचा अनुभव आपल्याला ज्ञानसंपन्न बनवतो. त्यामुळे आजच्या तरुणांनी देशसेवेची ही संधी गमावू नये, असं उपाध्याय यांना वाटतं.
कोणतंही काम, मग ते छोटं असो व मोठं… त्या कामावरची तुमची निष्ठा, समस्यांवर मार्ग काढण्याची प्रगल्भता याच्या जोडीला अधिकाराचा सुयोग्य वापर एखाद्या मोठ्या यंत्रणेला बदलायला भाग पडू शकतो. हे उपाध्याय यांच्याकडे पाहून जाणवतं .चांगले विचार, आचार, आणि संस्कार असतील तर एक चांगला समाज बनतो. असा समाज देशाचं भविष्य उज्जवल करतो, अशी उपाध्याय यांची ठाम श्रद्धा आहे. माणूस जन्मापेक्षा कर्माने मोठा होतो, मग कर्मभूमी कोणतीही का असेना, फक्त मातीत रुजविण्याची आणि बहरण्याची जिद्द हवी. खाकी वर्दीतला भूषणकुमार उपाध्याय नावाच्या मास्तरांना पाहून हे विचार मनोमन पटतात.