रिक्षाचालकाचा मुलगा आयएएस

समाजात पाय ओढणाऱ्यांचे आणि खच्चीकरण करणाऱ्यांची काही कमी नसते. रिक्षाचालकाचा मुलगा पुढे चालून रिक्षाच चालवणार. या शब्दात अनेकदा आजूबाजूचे लोक गोविंदला हिणवायचे. परंत, वडील नारायण यांनी नेहमीच गोविंदला शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं. अशा टोमण्यांमुळे गोविंद जराही निराश झाला नाही. उलट त्याचा निर्धार आणखी पक्का होत गेला. कल्फलक जीवन कंठत असलेले आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अडचणींचा सामना करत असलेले तरुणही प्रबळ इच्छाशक्ती आणि धैर्याच्या जोरावर यशाला गवसणी घालू शकतात याचा मला विश्वास आहे, असे गोविंदने आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितले होते. 

भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. लोकसंख्येच्या बाबतीत चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताचा दैनंदिन कारभार चालविणे वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. म्हणूनच या रचनेत भारतीय प्रशासकीय सेवेला (आयएएस) अनन्यसाधारण महत्त्व आहे. आयएएस अधिकारी हे सरकार आणि सर्वसामान्य जनता यांना जोडणारा दुवा आहेत. आयएएस अधिकारी होणं एवढं सोपं नाही. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (युपीएससी) घेतल्या जाणाऱ्या अत्यंत खडतर अशा परीक्षा व मुलाखत प्रक्रियेतून हिरे समजल्या जाणाऱ्या तरुण-तरुणींची आयएएस अधिकारी म्हणून निवड केली जाते. या परीक्षेसाठी कठोर मेहनत आणि अभ्यास करावा लागतो.

सर्व सुखसुविधा उपलब्ध असूनही अनेक जणांना ही परीक्षा उत्तीर्ण करणे शक्य होत नाही. काही जण फक्त प्रबळ इच्छाशक्ती आणि धैर्य, या दोन्ही गोष्टींच्या बळावर यशाला गवसणी घालतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या उत्तरप्रदेशातील वाराणसी येथील गोविंद जयस्वाल हे त्यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे. ‘इच्छा तेथे मार्ग’ ही उक्ती प्रत्यक्षात आणून गोविंदने यशाला पायाशी लोळण घ्यायला भाग पाडलं. कधीही अशा गोष्टी ऐकल्यानंतर ‘असंही होऊ शकतं’ हे शब्द आपसूकच बाहेर पडतात.

वाराणसी येथील गरीब रिक्षाचालकाचा मुलगा असलेल्या गोविंदने २००६ च्या नागरी सेवा परीक्षेत देशातून ४८ वा क्रमांक पटकावला आणि तो देखील पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करणाऱ्या गोविंदची प्रबळ इच्छाशक्तीच यातून दिसून येते. गोविंदने मिळविले हे यश फक्त त्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीचे फळ नसून, वडील नारायण यांचे स्वप्न आणि स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी केलेल्या परिश्रमाची फलश्रुती आहे. आपल्या अल्प उत्पन्नातूनही मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न नारायण यांनी केला.

गोविंदने मिळविलेले हे यश इतक्या सहजासहजी मिळालेले नाही आणि म्हणूनच त्याची यशोगाधा इतरांसाठी प्रेरणादायी आहे. गोविंदने आपले बालपण १२ बाय ८ चौरस फुटांच्या भाड्याच्या खोलीत घालविले. तेथे तो वडील, आई आणि बहिणींसह राहत होता. ज्या ठिकाणी आई स्वयंपाक करायची, भांडी घासायची, स्नान करायची तिथेच गोविंदला अभ्यास करावा लागायचा. हे नसे थोडके म्हणून की काय, त्याच्या घराच्या बाजूला असलेल्या छोट्यामोठ्या कारखान्यांमधील मशिन्स आणि जनरेटर्सच्या आवाजामुळे त्याच्या अभ्यासात व्यत्यय यायचा. कापसाचे बोळे कानात घातल्यानंतरच अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे गोविंदला शक्य होत होते.

वडील नारायण यांची पृष्ठभूमी फार वेगळी नव्हती. ते सरकारी स्वस्त धान्य दुकानात काम करायचे. दुकान बंद झाल्यामुळे त्यांनी नोकरी गमावली. त्यानंतर एक रिक्षा खरेदी करून ती भाड्याने दिली. बघताबघता त्यांनी आणखी काही रिक्षा खरेदी केल्या. त्यातून त्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळू लागले. याचवेळी नारायण यांनी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी थोडीफार गुंतवणूक केली. मुलींचे विवाह करायचे असल्याने त्यांनी बचतीतून तीन छोटे भूखंड खरेदी केले. अशातच दुर्दैव आड आले आणि कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. गोविंदच्या आईचे निधन झाले. त्याच कालावधीत नारायण यांच्या रिक्षा व्यवसायालाही फटका बसल्यामुळे कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

अशा विषम परिस्थितीतही नारायण यांनी स्वप्न बघणे सोडलं नाही. तसंच ते गोविंदनेही नाही. आयएएस अधिकारी झालो तर आपल्याला जीवनात काहीतरी साध्य करता येऊ शकेल, असंच त्याला वाटायचं. तशी सरकारी नोकरी मिळवायची म्हटल्यावर लाच दिल्याशिवाय ती मिळणं नाही. व्यवसाय सुरू करायला पैसा नाही, याची त्याला जाणीव होती. मुलींच्या विवाहाची जबाबदारी पार पाडल्यानंतर नारायण यांनी त्यांच्याकडे असलेला शेवटचा भूखंड ४० हजारात विकला आणि ते पैसे गोविंदला दिले. जेणेकरून त्याला दिल्ली येथे आयएएस परीक्षेचे प्रशिक्षण घेता येईल. गोविंदने गणित हा पुरवणी विषय घेऊन त्यासाठी शिकवणी लावली. इतरांसारख्या दोन-चार संधी मिळणार नाहीत आणि त्यामुळेच आपल्यासाठी ‘करो वा मरो’ अशीच स्थिती असल्याची गोविंदला जाण होती. वडिलांनी दिलेले पैसे फारफार तर वर्षभर पुरतील. हे लक्षात घेऊन आणखी मेहनत करण्यास प्रवृत्त केले.

गोविंदने कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर खूप अभ्यास केला आणि आयएएसची परीक्षा दिली. गोविंदच्या आयएएस परीक्षा निकाल लागण्यापूर्वी दहा दिवस आधीपासूनच नारायण यांना झोप लागली नव्हती. गोविंदने आयएएसची परीक्षा उत्तीर्ण केली आणि तो अव्वल ५० मध्ये आला आहे. हे कळताच वडील नारायण काही काळ हवेतच होते. हे सत्य पचविण्यासाठी त्यांना थोडा वेळ लागला आणि स्वप्नपूर्तीचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होते. आता आपले कष्टाचे दिवस संपले आणि पालकांचे स्वप्न पूर्ण करू शकतो, याचं गोविंदला समाधान आणि आनंद होता. कल्फलक जीवन कंठत असलेले आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अडचणींचा सामना करत असलेले तरुणही प्रबळ इच्छाशक्ती आणि धैर्याच्या जोरावर यशाला गवसणी घालू शकतात याचा मला विश्वास आहे, असे गोविंदने आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितले होते. गोविंदने परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर अत्यंत विषम परिस्थतीवर मात करून जे यश मिळविले, ते इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.