
महाराष्ट्राचा भुगोल अभ्यासताना सहस्रकुंड धबधबा वाचनात येतोच. नांदेड जिल्ह्यातील धबधब्यांपैकी पर्यटकांची गर्दी खेचून आणणारा हा एक धबधबा आहे. पैनगंगा नदीवर हा धबधबा आहे. या धबधब्यांना भेट द्यायची झाल्यास पर्यटक माहूर येथील रेणुकादेवी मंदिर, दत्त शिखर, अनुसया मातेचे मंदिर पाहू शकतात. पैनगंगा नदीचा उगम बुलढाणा जिल्ह्यात झाला असून ती यवतमाळ जिल्ह्यातून वाहत पुढे वर्धा नदीला मिळते. उमरखेड तालुक्यात नांदेडपासून अंदाजे १०० कि.मी. अंतरावर हा धबधबा आहे.
पैनगंगेचा प्रवाह एका मोठ्या खडकामुळे विभागला असल्याने पाणी खाली कोसळताना दोन धारांद्वारे पडते. हा धबधबा अंदाजे ३०-४० फूट उंचीवरून कोसळताना ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात अक्षरश: रौद्र रूप धारण करतो. त्यावेळेस पावसाचे दिवस असल्याने नदीमधील पाणीपातळीसुद्धा वाढलेली असते. धबधब्याची एक धारा मराठवाड्याच्या बाजूकडून कोसळते . हा धबधबा अगदी १५-२० फुटावरून पाहता येतो. नदीच्या विदर्भाच्या बाजूकडून मात्र ४ -५ अप्रतिम धबधबे पहायला मिळतात. या धबधब्याजवळ छोटेसे उद्यान आहे. मात्र आवशक सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे नयनरम्य असूनही येथे पर्यटकांची संख्या तुलनेने कमी असते. या छोट्याशा बागेत विविध रंगांची फुलपाखरे पहायला मिळतात. धबधब्याजवळ पंचमुखी महादेवाचे मंदिर आहे. धबधबा पाहण्यासाठी नांदेडहून खासगी वाहनाने व एसटी महामंडळाच्या बसेसने जाता येते.