
कोल्हापूर व सिंधुदुर्गास जोडणारा तिलारी घाट डोळ्यांना तृप्त करणारा आहे. मुसळधार पावसात अपघात टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या घाटातून अवजड वाहनांना बंदी घालण्यात येते. या भागात ‘तिलारी’ नदीवर बांधलेले तिलारी धरण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात असून हा महाराष्ट्र आणि गोवा सरकारचा संयुक्त उपक्रम आहे.
तिलारी धरणापासून केवळ 15 मिनिटांच्या अंतरावर, विशाल जलाशय असून सभोवतालचे पर्वतांचे नेत्रदीपक दृश्य मन हरखून टाकते. येथील वाहन चालविण्याचा अनुभव रोमांचकारी असतो. तिलारीमध्ये रानडुक्कर, काळवीट, हरीण, माकडे, हत्ती, वाघ आणि बिबट्या यांसारख्या अनेक प्राण्यांचा संचार असतो. या परिसरात मोर, वुडपेकर, किंगफिशर, बगळे, हॉर्नबिल, कोकिळा इत्यादींसह पक्ष्यांच्या 50 हून अधिक प्रजाती सहज आढळतात.

शेतजमिनीपासून पुढे 20 किलोमीटर अंतरावर तिलारी घाटाच्या माथ्यावर थरारक डोंगराळ प्रवास सुरू होतो. या घाटातील प्रवास सुमारे 10 किलोमीटरचा असून उतारांची वळणे आणि आश्चर्यकारक दृश्ये प्रवासाचा आनंद देतात. या जंगलात वाघ, बिबट्या, हरीण, हत्ती, जंगली म्हशी आणि बरेच काही आहे. येथून 30 मिनिटांच्या अंतरावर मांगेली धबधबा आहे. हे धबधबे हंगामी असतात. म्हणजे पावसात जून ते जानेवारीपर्यंत ते प्रवाहित असतात. यावेळी अनेक पर्यटकांची पावले येथे वळत असतात. एकूणच, हा तिलारी घाट नेहमीच त्याच्या हिरवळीने सर्वांना सुख प्रदान करतो.