वटपौर्णिमा


हिंदू पंचांगाप्रमाणे ज्येष्ठ महिन्यातील पहिल्या पौर्णिमेचा दिवस हा ‘वटपौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. विवाहित स्त्रिया या दिवशी उपवास करतात आणि आपल्या यजमानांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. ‘वडाचे झाड’ हे निसर्गतःच दीर्घायुषी असल्यामुळे नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी वडाचे पूजन करायची परंपरा भारतीय संस्कृतीने स्वीकारलेली असावी.
या व्रतावेळी पारंपरिक ‘सावित्री आणि सत्यवाना’ची पौराणिक आख्यायिका सांगितली जाते. अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला ‘सावित्री’ नावाची कन्या होती. राजकन्या सावित्री दिसायला अतिशय सुंदर, नम्र आणि गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिला आपला पती निवडण्यास सांगितले.
सावित्रीने ‘सत्यवान’ नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. राजा शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी आणि मुलासह जंगलात राहत होता. नारदमुनींना सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत होते. त्यामुळे नारदमुनींनी सावित्रीला त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला दिला; तरी सावित्रीने सत्यवानाशी लग्न केले. नवऱ्याबरोबर सावित्री जंगलामध्ये येऊन राहिली. तिच्या संसारात नांदू लागली. सासू सासऱ्यांची सेवा करू लागली.

सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली आणि तो जमिनीवर पडला. ‘यम’धर्म तिथे आला आणि सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले, पण तिने नकार दिला. अखेर कंटाळून यमाने तिच्या पतीचे प्राण सोडून अन्य तीन वर मागण्यास सांगितले.
सावित्रीने सासऱ्यांचे डोळे, त्यांचे राज्य परत मागितले आणि आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमाने तिच्या 3 मागण्यांना ‘तथास्तु’ म्हटले आणि त्याला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाखाली परत मिळविले. म्हणून त्यादिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात.
सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला होता, तेव्हा सावित्रीने तीन दिवस उपवासाच्या व्रताला आरंभ केला होता. हे व्रत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत असे ‘त्रिरात्र व्रत’ करायचे असते. म्हणून ‘वटपौर्णिमे’चा उपवासही तीन दिवसांचा केला जातो. ज्यांना तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल त्या स्त्रिया फक्त पौर्णिमेच्या दिवशी उपवास करतात.