ओशिवरा नदी वाचवा

मुंबईतील ‘ओशिवरा’ नदी प्रदूषित होत आहे. या प्रवाहात कारखान्यातील टाकाऊ माल सातत्याने टाकला जात असल्याचे स्थानिकांना आढळून आले आहे. येथे सीसीटीव्ही कधी बसवले जातील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सीसीटीव्हीमुळे नैसर्गिक स्थळांची होणारी हानी थांबू शकेल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

पावसाळ्याच्या सुरुवातीला मुंबईमध्ये दरवर्षी नालेसफाई केली जाते. नद्यांच्या स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात. या नद्यांमध्ये कचरा टाकू नये यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याची तक्रार गोरेगावमधील स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते संदीप सावंत यांनी केली आहे.

नदी-नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवले जाणार होते. मात्र आजपावेतो कॅमेरे लावण्यात आलेले नाहीत. कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते नाराजी व्यक्त करीत आहेत.