
झी मराठी वाहिनीवरील मालिका आणि त्यातील पात्रे प्रेक्षकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतात. काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका आणि त्यातील ‘राधिका सुभेदार’ हे पात्र आजही तितकेच लोकप्रिय आहे. गृहिणी म्हणून संसार सांभाळणारी राधिका, पुढे एक यशस्वी उद्योजिका कशी बनते आणि आयुष्यातील आव्हानांना धैर्याने कशी सामोरी जाते, हा प्रवास लाखो महिलांसाठी प्रेरणादायी ठरला होता. आता हीच लाडकी राधिका सुभेदार म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. झी मराठीच्याच ‘सनई चौघडे’ या लोकप्रिय मालिकेत तिची एन्ट्री झाल्याने मालिकेच्या कथानकाला आता एक वेगळी कलाटणी मिळाली आहे.
‘सनई चौघडे’ या मालिकेच्या कथानकात सध्या जय खानोलकर हे पात्र केंद्रस्थानी आहे. जय खानोलकर हा एक यशस्वी उद्योजक असला तरी त्याचे व्यक्तिमत्व तितकेच हट्टी आणि पुरुषप्रधान आहे. त्याच्या कंपनीच्या कामकाजात एका विशिष्ट नियमाचे पालन केले जाते, तो म्हणजे – त्याच्या ऑफिसमध्ये महिलांना नोकरी दिली जात नाही. मुलींच्या कार्यक्षमतेवर विश्वास नसल्यामुळे त्याने आजवर केवळ पुरुष कर्मचाऱ्यांचीच भरती केली आहे. या विचित्र आणि अन्यायकारक नियमामुळे शर्वरीसारख्या हुशार मुलीला आपली नोकरी सोडावी लागली होती. यामुळे कथानकात जयच्या विरोधात एक नकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. मात्र, राधिका सुभेदारच्या एन्ट्रीने या परिस्थितीत मोठा बदल घडवून आणला आहे.
मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागांत आपण पाहिले की, राधिका सुभेदार थेट जय खानोलकरच्या केबिनमध्ये प्रवेश करते. ३०० कोटींच्या साम्राज्याची मालकीण आणि एक कणखर बिझनेसवुमन म्हणून तिची ओळख जयसाठी एक आव्हान ठरली आहे. जय जेव्हा तिला प्रश्न विचारतो, तेव्हा तिने दिलेली उत्तरे जयची बोलती बंद करणारी होती. “हो, मी तीच राधिका सुभेदार आणि तुम्हीच का ते जय खानोलकर, ज्यांच्या ऑफिसमध्ये स्त्रियांना प्रवेश निषिद्ध आहे?” अशा तिच्या थेट प्रश्नाने जयलाही थक्क केले.
राधिकाने येथे एक अट ठेवून जयला पेचात पकडले आहे. तिने स्पष्टपणे सांगितले की, जोपर्यंत तुम्ही तुमच्या कंपनीत स्त्रियांना कामावर घेण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलत नाही, तोपर्यंत मी तुमच्या कंपनीमध्ये एक रुपयाचीही गुंतवणूक करणार नाही. ही अट ऐकून जय खानोलकरला मोठा धक्का बसला आहे. राधिकाची ही मागणी केवळ एका गुंतवणुकीपुरती मर्यादित नाही, तर ती एका स्त्रीच्या आत्मसन्मानाची लढाई आहे. आता जय खानोलकर या परिस्थितीचा सामना कसा करणार आणि राधिकाच्या अटीपुढे त्याला झुकावे लागणार का, राधिकाच्या येण्यामुळे शर्वरीचा पुन्हा ऑफिसमध्ये सन्मानाने प्रवेश होणार का? आणि जय खानोलकरच्या मानसिकतेत काही बदल होणार का? या बदलाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.