मुलांच्या सवयींकडे लक्ष हवे

प्रत्येक आई-वडिलांसाठी त्यांची मुले खूप खास असतात. आपल्या मुलांना चांगले आयुष्य आणि भविष्य देण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. पालक आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आपल्या मुलांसाठी वेचतात. तथापि, बऱ्याच वेळा आपल्या मुलांची काळजी घेण्याच्या आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात पालक बऱ्याचदा अशा काही गोष्टी करू लागतात, ज्यामुळे मुले मजबूत होण्यापासून दुरावतात. जर आपणांस आपल्या मुलाला शारिरीक व मानसिकदृष्ट्या सशक्त बनवायचे असेल, तर लहानपणी आपल्या मुलांच्या काही सवयींवर नियंत्रण ठेवावे लागेल. बालपणातील चांगल्या सवयी आयुष्य सार्थकी लावतात. पालक म्हणून मुलाचे रक्षण करण्यासाठी आपण त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. त्याला मार्गदर्शन करा. मुलांना कोणी काही प्रश्न विचारले तर त्यांना उत्तर देण्याची संधी द्या. गरज असेल तेव्हा मुलांना मदत करण्यात काही नुकसान नाही, पण गरजेपेक्षा जास्त मदत केल्याने त्यांच्या शरीराबरोबरच मानसिक हानीही होऊ शकते. अशामुळे मुले प्रत्येक कामासाठी तुमच्यावर अवलंबून असतात. म्हणून, त्यांना स्वतःहून जीवनातील अडचणींना सामोरे जाऊ द्या. आवश्यक असेल तेथे हात द्या.

प्रत्येक गोष्टीसाठी मुलांना भेटवस्तू दिल्याने त्यांचे नुकसान होऊ शकते. यासाठी त्यांना विनाकारण कोणतीही भेटवस्तू न देण्याचा प्रयत्न करा. मुलांसाठी सर्वोत्तम भेट म्हणजे पालकांचा वेळ असतो. त्यामुळे त्यांच्यासोबत वेळ घालवा. मुलांना त्यांच्या अडचणींना सामोरे जाण्याची संधी द्या. समस्या सोडविण्यासाठी त्यांना त्यांच्या मेंदूचा वापर करू द्या. त्यांना आधार द्या. जर ते मानसिक तणावाखाली असतील तर त्यांना नक्कीच मदत करा. मुलांना संकटाशी दोन हात करण्यासाठी तयार करा. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत ती डगमगणार नाहीत, याची काळजी घ्या. मुलांना वाढवणे म्हणजे केवळ त्यांचे पोषण करणे एवढेच नसून त्यांचा मानसिक, भावनिक विकास होणेही फार महत्त्वाचे आहे. याचा विचार पालकांनी मुलांना वाढवताना करायला पाहिजे. यामुळे मुलांचे भविष्य सुखकर होईल.