धारूर किल्ला

बीड जिल्ह्यातील धारूर येथे राष्ट्रकुटांच्या काळात शहराचे संरक्षण करण्यासाठी ‘महादुर्ग’ नावाचा किल्ला बांधण्यात आला. याला धारूर किल्ला असे नाव आहे. त्या किल्ल्यात भर घालून त्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी या किल्ल्यात नवीन बांधकामे केली. त्यामुळे आजही किल्ला व त्यातील अवशेष बऱ्यापैकी शाबूत आहेत. येथे किल्ल्याबरोबरच अंबेजोगाईचे मंदिर, लेणी, धर्मापूरीचा किल्ला व प्राचीन केदारेश्वर मंदिर ही ऎतिहासिक ठिकाणे पाहता येतात.
या भागावर वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रकुटांनी धारूर येथे किल्ला बांधला गेला. ‘महादुर्ग’ नावाने हा किल्ला त्यावेळी ओळखला जात असे. त्यावेळी साधे दगड एकमेकांवर रचून या गडाची तटबंदी बांधण्यात आली होती.

धारूर गावातून गाडीने थेट किल्ल्यापर्यंत जाता येते. धारूर गाव व किल्ला एकाच पातळीवर असल्यामुळे त्याला ‘भूईकोट’ म्हणत. या किल्ल्याच्या इतर तीन बाजूंनी खोल दरी आहे. त्यामुळे या तीन बाजूंनी किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण आहे. उरलेल्या चौथ्या बाजूने किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी ४.२ मीटर रूंद व ४.५ मीटर खोल खंदक खोदलेला आहे.या खंदकाच्या उत्तर भागात एक बांधीव तलाव असून त्याला ‘सोलापूर दिंडी किंवा खारी दिंडी’ म्हणतात. पूर्वीच्या काळी खंदकात पाणी सोडलेले असे.

धारूर किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे. तटबंदी व बुरूज यावरून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बनवलेल्या आहेत. किल्ल्यात शिरण्यापूर्वी डाव्या बाजूच्या खंदकात उतरून अष्टकोनी बुरुजाजवळ जावे लागते. या बुरुजाला ‘हाथी बुरुज’ म्हणतात. या बुरुजावर दोन शरभाची शिल्प व त्यांच्या मधोमध हत्तीचे शिल्प आहे. शरभाच्या मागे ढाल, तलवार घेतलेला योध्दा कोरलेला आहे. हा किल्ला प्रेक्षणीय आहे.