औसा किल्ला

महाराष्ट्रातील गडकिल्ले हे राज्याचे वैभव आहे. असाच एक भुईकोट किल्ला लातूरमध्ये औसा शहराच्या बाजूला आहे. हा किल्ला औसा किल्ला म्हणून ओळखला जातो. बहामनी राजवटीत इ.स.१४६६ मध्ये महमूद गवान याने वजीर असताना हा किल्ला बांधला. अगदी जवळ गेल्याशिवाय हा किल्ला दिसत नाही. किल्ल्यातील काही वास्तू व तटबंदीच्या काही भागावर तुर्क व युरोपियन स्थापत्यशैलीचा प्रभाव दिसतो.

औसा येथे भुईकोट किल्ला असून त्याचे क्षेत्रफळ २४ एकर ३० गुंठे आहे. या किल्ल्याभोवती एक खंदक असून सध्याही चांगल्या स्थितीत आहे. या खंदकात अनेक विहिरी आहेत. खंदकाला लागून किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी मोठा दरवाजा आहे. या दरवाजाला ‘लोह्बंदी’ दरवाजा म्हणतात. लोह्बंदी दरवाजा हे पूर्वाभिमुख आहे. या दरवाजातून आत गेल्यावर ‘अह्शमा’ नावाचा दरवाजा मिळतो. या किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी हा एकमेव दरवाजा आहे. किल्यायाच्या आत राणीमहाल, लालमहाल, पाणीमहाल इत्यादी अनेक इमारती आहेत. किल्ल्यात ‘परिबावडी’, ‘कटोराबावडी’ व ‘चांदबावडी’ या तीन महत्त्वाच्या विहिरी आहेत.

शहरातील किल्ल्याला ऐतिहासिक काळात राजकीय महत्त्व होते. या शहराला यादवपूर्व काळापासून महत्त्व होते. मराठ्याच्या स्वातंत्र्ययुद्धात धनाजी जाधव आणि मोगल सेनापती झुल्फिकार खान यांच्यात अनेक चकमकी झाल्या होत्या. औसा किल्ला पहायला जाणारे पर्यटक येथील नंगेबाबांची समाधी, औसेकर महाराज, पडद्याप्पा मठ, कौकाडी बाबांचा मठ, गोसायाचा मठ, अशा अनेक ऐतिहासिक वास्तू पाहून येऊ शकतात. औसा भुईकोट किल्ला लातूरपासून २० किलोमीटरवर अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था होऊ शकते.