आंबा विक्री व्यवसाय

वर्षभरातून एकदाच खायला मिळणाऱ्या आंब्याला देशविदेशातून मागणी आहे. मार्चपासून आंब्याची चाहूल बाजारात लागू लागते. तो जूनपर्यंत मुक्कामी असतो. त्यामुळे कमी महिन्यात जास्त नफा करून देणारा असा हा ‘आंबा विक्री व्यवसाय’. आंब्याचा रस हल्ली प्रक्रिया उद्योगामुळे आपण वर्षभर चाखू शकतो. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानातील सुधारणेमुळे आंब्याचे विविध पदार्थ वर्षभर उपलब्ध असतात. पण आंबा फळ खाण्याची मजा काही वेगळीच असते.
महाराष्ट्रातून आंब्याची दरवर्षी सर्वाधिक निर्यात केली जाते. जवळपास आंब्याच्या १७ जाती आढळतात. आंब्याला उष्ण आणि दमट हवामान आवश्यक असते. जेवढा जास्त उन्हाळा, तेवढा जास्त मोहोर हे गणित ठरलेले आहे. रत्नागिरी आणि देवगड हापूस, जुन्नर हापूस, केसर, पायरी, तोतापुरी, दशेहरी, बदामी रत्ना, सिंधू यांना बाजारात जास्त मागणी आहे. प्रत्येक आंब्याच्या चवीत आपल्याला फरक जाणवतो.‘कृषी बाजार उत्पन्न समिती’मधून तुम्ही मोठ्या प्रमाणात आंब्यांची खरेदी करू शकतात. त्याचप्रमाणे कोकणातील एखादी आमराई भाडेतत्त्वावर घेऊन आमराईतून आंब्यांची मागणी थेट ग्राहकांपर्यंत पोहचवू शकतात. जर तुम्ही छोट्या प्रमाणात आंबा विक्री व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल, तर आवश्यक तेवढ्यात मालाची उचल तुम्ही बाजारपेठेतून करू शकतात. जेणेकरून तुमची गुंतवणूक आणि मिळणारा नफा याचा मेळ बसवणे शक्य होईल.
आंब्याची फळानुसार आणि डझनवारी वर्गवारी करून त्याची किंमत निश्चित केली जाते. दोन डझन आणि चार डझन आंब्यांच्या पेट्यांना बाजारात जास्त मागणी आहे. त्याचप्रमाणे मध्यम आकाराचे फळ आणि मोठ्या आकाराचे फळ बाजारात जास्त विकले जाते. विक्री व्यवसायाचे दुकान आंब्याच्या मोसमात स्थापन करण्यासाठी प्राथमिक गुंतवणूक अंदाजे ५०,००० रुपयांची आहे. दुकानाऐवजी तुम्ही ऑनलाईन विक्रीचाही पर्याय निवडू शकतात. आंब्याचा मोसम ठराविक चार महिन्यांसाठीच असला, तरी कमी दिवसांत जास्त नफा करून देणारा असल्याने तुम्ही योग्य नियोजन केल्यास या व्यवसायात फायदा ठरलेला आहे.