
साहित्य : बिर्याणीचा तांदूळ – 2 कप, साजूक तूप – 5 ते 6 चमचे (विकतचेही तूप चालेल), लवंगा – 4 ते 5, लिंबाचा रस, मिरी – 4 ते 5, चिरलेले कांदे – 2, तमालपत्र – 2, वेलची – 4, दालचिनी – 2 काड्या, काजू – अर्धा कप, बेदाणे – पाव कप (ऐच्छिक), किसलेले आले – 1 चमचा, वाटलेला लसूण – 1 चमचा, चिरलेली कोथिंबीर आपल्या आवडीप्रमाणे, पाणी – साडे तीन कप, मीठ – चवीनुसार.
कृती : तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. पाणी पूर्णपणे काढून तांदूळ बाजूला ठेवून द्या. एका कढईत तीन चमचे तूप गरम करुन त्यात काजू तांबूस होईपर्यंत परतून घ्या. काजू काढल्यावर त्यात बेदाणेही असेच खरपूस परतून मग एका ताटात काढून घ्या. आता कढईत आणखी थोडे तूप घालून गरम करुन घ्या. त्यात कांदा घाला आणि मीठ घालून छान परतून घ्या. या मिश्रणाला तांबूस रंग यायला हवा. आता परतलेले काजू आणि बेदाणे ठेवलेल्या ताटात हा कांदा काढून घ्या.
आता ज्यात भात बनविणार आहोत, अशा भांउ्यात आणखी थोडे तूप गरम करा. ते तापल्यावर त्यात लवंगा, वेलची, ठेचलेली मिरी आणि आले-लसूण घाला. हे चांगले परतून झाल्यावर यात एक चिरलेला कांदा घाला. छान परतून झाले की यात धुवून बाजूला ठेवलेला तांदूळ घाला. चांगले मिसळून गरजेप्रमाणे मीठ घाला. कोथिंबीर, तमालपत्राचे तुकडे घालून एकदा परतून घेऊन त्यात पाणी घाला. एकदा चारही बाजुंनी मस्त ढवळून भांड्यावर झाकण ठेवून द्या. साधारण पाच मिनिटांनी झाकण काढून बघा. यावेळी त्यात थोडा लिंबाचा रस घालून चांगले मिसळा. भात शिजला की त्यात परतून ठेवलेले काजू, बेदाणे व तळलेला कांदा घाला. तूप भात तयार आहे.