
बालाघाट रांगेत रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध ‘आजा पर्वत’ उर्फ ‘आजोबाचा डोंगर’ आहे. ठाणे जिल्ह्यातील हा गड हरिशचंद्र अभयारण्याचा भाग आहे. येथे घनदाट अरण्याचे दर्शन घडते. येथे वाल्मिकी आश्रम असल्यामुळे या भागाला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. गडाच्या नावाला एक इतिहास आहे. असे म्हणतात की, या गडावर बसून वाल्मिकींनी ‘रामायण’ हा धर्मग्रंथ लिहिला. याच गडावर सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला.
लव आणि कुश वाल्मिकी ऋषींना ‘आजोबा’ म्हणत असत. म्हणूनच या गडाचे नाव ‘आजोबाचा गड’ असे पडले, असे सांगतात. गडावर वाल्मिकी ऋषींचा आश्रम व त्यांची समाधी आहे. देहेणे येथून वाल्मिकी आश्रमाच्या अलिकडे दोन किलोमीटरपर्यंत पक्का रस्ता आहे. तेथपर्यंत वाहनाने जाता येते. पुढे कच्च्या रस्त्याने वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापाशी पोहोचण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो.
येथे वाल्मिकी ऋषी, कालभैरव व शंकराची मंदिरे आहेत. येथे भक्त निवास आणि ध्यान कक्ष आहे. आश्रमासमोर असलेल्या काही पायर्या उतरल्यावर वर्षभर पाणी असणारी दोन पाण्याची टाके आहेत. या आश्रमामागून गेल्यावर डाव्या बाजूला वर एक गुहा आहे. येथे सध्या लोखंडी शिडी बसवलेली आहे. शिडीवरुन गुहेत चढून गेल्यावर लव-कुशच्या पादुका खडकात कोरलेल्या दिसतात. तेथेच लव कुशचा पाळणा लावलेला आहे.
देहेणेहून वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापर्यंत जाण्यासाठी अर्धा तास लागतो. गडावर सापांचे दर्शन होत असल्याने सावध असणे गरजेचे आहे. कल्याण – मुरबाडमार्गे देहेणे गावी जाता येते.गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे.