मुलांच्या खाण्याकडे लक्ष हवेच

आपले मूल जेवत नाही, ही बऱ्याचजणींची तक्रार असते. त्यासाठी आई आपल्या शैलीने वेगवेगळे प्रयत्न करतानाही दिसते; परंतु प्रत्येक वेळी मूल खाण्यात आवड दाखवत नसल्यामुळे आईला त्रास होतो. यासाठी आधी मुले का जेवत नाहीत, याचा अभ्यास करायला हवा. ती दिवसभरात काय खातात याकडे लक्ष द्यायला हवे. खाण्याची अनिच्छा मुलांच्या विकासात अडथळा ठरते. अन्न नीट न खाल्ल्यामुळे मुलांमध्ये अनेक प्रकारच्या कमतरता निर्माण होतात. त्यामुळे त्यांच्या वाढीसही आळा बसू शकतो. खुरटेपणाची समस्या निर्माण होऊ शकते. हे रोखण्यासाठी वेळीच प्रभावी उपाय योजणेची गरज असते; जेणेकरून आपले मूल निरोगी आणि तंदुरुस्त बनेल. शक्य असल्यास स्वतः स्वयंपाक करताना मुलांना स्वयंपाकात सहभागी करून घ्यावे. त्यांना अन्नाचे महत्त्व समजावून सांगावे. आपले मूल जर खूप गोड खात असेल, त्याच्या शरीरात लोहाची कमतरता असेल, जास्त फास्ट फूड खाल्ले असेल तर त्यांना सहजपणे भूक लागणार नाही. म्हणून मुलांना जीवनसत्व ‘सी’ व फायबरयुक्त पदार्थ खाण्यास द्यावेत. यासाठी आहारात लिंबू, टोमॅटो, संत्री आणि स्ट्रॉबेरीचा समावेश करू शकता. त्यामुळे त्यांची भूक वाढण्यास मदत होईल.

तांदूळ, डाळी, संपूर्ण धान्य, पालक, ब्रोकोली, हरभरा आणि वाटाणे असा पौष्टिक आहार द्यावा. फास्ट फूड टाळावे. मुलांना बडीशेप खायला द्यावी. बडीशेप औषधासारखे काम करते. अपचन, बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यास मदत करते. मुलांना त्यांचा आवडता पदार्थ सारखा आणि भरपूर देऊ नये. नाहीतर मुले एकच पदार्थ नेहमी खात राहतील. अन्नपदार्थ आकर्षकपणे सजवावे. उदाहरणार्थ, कोणत्याही खाद्यपदार्थाला त्यांच्या आवडत्या कार्टूनचा आकार द्यावा. त्यामुळे मुले जेवताना त्यांचे लक्ष टीव्ही किंवा मोबाईलवर जाणार नाही. ते फक्त खाण्यावर लक्ष केंद्रित करतील. दररोज वेळेवरच अन्न द्यावे. दर दोन-तीन तासांनी आरोग्यवर्धक अन्नपदार्थ थोडे-थोडे खाण्यास द्यावेत. दररोज काहीतरी नवीन बनवावे. ज्यामुळे मुलांना पदार्थ खावासा वाटेल.