केवडा लागवड

भारतात फुलशेतीला महत्त्व प्राप्त होत आहे. बरेच शेतकरी फुलांची शेती करताना आपण महाराष्ट्रातही पाहायला लागलो आहोत. बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने फुलशेतीमध्ये यश मिळताना दिसत आहे. केवड्याचा वापर सुगंधी द्रव्ये, मिठाई, सौंदर्य उत्पादने यांमध्ये केला जातो. ‘केवडा’ हा जगातील सर्वांत सुगंधी फुलांच्या यादीमध्ये स्थान मिळवलेलं सुगंधी फूल आहे.
भारतात ओरिसा राज्यात सर्वाधिक केवड्याचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रातदेखील समुद्रकिनारी, नद्या, तलाव किंवा इतर जलस्रोतांच्या काठावर केवडा उगवतो. कमी वेळात जास्त नफा मिळवून देणारी अशी ही केवडा लागवड असल्याने शेतकरी अधिक रुची दाखवतात. परदेशातही तैवान, दक्षिण जपान, दक्षिण इंडोनेशियापर्यंत आपल्याला केवड्याची लागवड केलेली आढळते.
वालुकामय चिकणमाती केवडा लागवडीसाठी आवश्यक असते. अगदी नापीक, रेताड आणि पाणथळ जमिनीतूनही केवड्याचे उत्पादन घेता येते. केवड्यापासून बनवलेले तेल ४ ते ५ लाख रुपयांना विकले जाते, तर अत्तराची किंमत ३० ते ४० हजार प्रतिलीटर असते.केवडा एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. कर्करोग, फुफ्फुसाचे विकार, मूत्र आजार, हृदयविकार, कानाचे आजार, रक्तदोष, डोकेदुखी, त्वचारोग, पोटाच्या संदर्भातील तक्रारींवर केवडा हे वरदान ठरत आहे.