
आपणांस इतरांच्या मदतीस जाण्यातून आनंद मिळत असेल तर यापेक्षा दुसरे चांगले काहीही असू शकत नाही. इतरांच्या आनंदाची काळजी घेण्यात स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. स्वत:ला मागे ठेवण्याची सवय अनेक प्रकारे हानिकारक आहे. एक काळ असा येतो, जेव्हा व्यक्तीला एकटेपणा जाणवतो, उदासीन वाटू लागते. जेव्हा तो स्वतः काही समस्येत असतो, आणि त्याला मदत करण्यासाठी तेथे कोणीही नसते. त्याच्या मनात इतरांविरुद्धच्या तक्रारी जमा होऊ लागतात. या सगळ्याचा विचार करून तो काळजीत पडतो. ही प्रवृत्ती मानसिक आरोग्यासाठीसुद्धा अत्यंत घातक आहे. मी इतरांसाठी खूप काही करतो, पण मला कोणी मदत करीत नाही. सगळ्या जबाबदाऱ्या मला एकट्यालाच पेलाव्या लागतात. असे नकारात्मक विचार मनात येतात. या विचारांपासून दूर राहण्यासाठी प्रथम परिस्थिती ओळखण्याचा प्रयत्न करावा.
या विचारांमुळे मनात असंतोषाची भावना निर्माण होऊ शकते. मनात तणाव निर्माण होतो. तेव्हा जाणीवपूर्वक त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. इतरांना मदत करताना सुरुवातीपासूनच स्वतःकडेही तेवढेच लक्ष द्या. अन्यथा कठोर वृत्ती अंगीकारली म्हणजे स्वत:चा विचार करणे सोडून दिले, तर अचानक बदल घडवून आणणे अशक्य असते. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्व प्रयत्न करूनही समस्येवर तोडगा निघत नसेल, तर विश्वासू मित्राशी बोलण्यास अजिबात संकोच करू नका. तरीही बदल होत नसेल तर समुपदेशकाचा सल्ला घ्या.
आपल्या मनात प्रबळ इच्छाशक्ती असल्यास प्रत्येक समस्येवर उपाय शक्य आहे. कधी आपले मन अस्वस्थ असेल तर काही चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा. कधी कोणी आपली प्रशंसा केली असेल, कधी आपल्याला पुरस्कार मिळाला असेल, आपल्या मदतीसाठी कोणी आले असेल तर ते लक्षात ठेवा. अशा सकारात्मक गोष्टींमुळे आपणांस आपले महत्त्व कळून खूप छान वाटेल. कोणत्याही परिस्थितीत नकारात्मक विचारांपासून अंतर ठेवा. स्वत:च्या आनंदाशी तडजोड करू नका. इतरांना माफ करायला शिका. जीवनातील कटू अनुभव विसरा. चांगल्या कामासाठी स्वतःची प्रशंसा करा.