आनंदी वैवाहिक जीवनासाठी

विवाहबंधन गुंफणाऱ्या लोकांसाठी विवाह हा खूप मोठा निर्णय असतो. तो जीवनाला दिशा देतो. लग्न करतानाच तरुणांनी लक्षात घ्यायला हवे, की आयुष्यात जोडीदारासोबत काही जबाबदाऱ्याही येतात, अनेक तडजोडी कराव्या लागतात. कधी-कधी तुम्हाला आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. याची मानसिक तयारी करुन ठेवायला हवी. याचा अर्थ लग्नापासून घाबरवण्याचा नसून या नात्याला सुंदरता देण्यासाठी तयार करणे हा आहे. भारतात अलिकडे घटस्फोटाच्या घटना वाढत आहेत. ते लक्षात घेता या गोष्टींवर चर्चा होणे गरजेचे आहे. अलीकडेच हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल लग्नाच्या १२ वर्षानंतर पती भरत तख्तानीपासून विभक्त झाली आहे. ईशा देओलने २९ जून २०१२ रोजी उद्योजक भरत तख्तानीसोबत लग्न केले. दोघांना राध्या आणि मिराया या दोन मुली आहेत. दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. आपल्या दोन्ही मुलींना डोळ्यासमोर ठेवून तिने हे मोठे पाऊल उचलले आहे.

या यादीत आमीर खान- किरण राव, मलायका अरोरा- अरबाज खान, हृतिक रोशन- सुझैन खान यांसारख्या अनेक नावांचा समावेश आहे. अनेक वर्षे एकत्र घालवून काहीजण वेगळे झाले. आपण एकत्र राहत असाल पण एकमेकांशी बोलत नसाल तर एकत्र राहण्यात काय अर्थ आहे ? हे काही काळ सहन केले जाऊ शकते, परंतु जास्त काळ नाही. जर तुम्हाला वाटत असेल की मौन राखून तुम्ही तुमच्या जोडीदाराला त्याची चूक समजून देऊ शकता, तर तुम्ही चुकीचा विचार करीत आहात. या संवादाच्या अभावामुळे घटस्फोट नक्कीच होऊ शकतो. तसेच इगोचे आहे. इगो केवळ विवाहितच नाही तर इतर नातेसंबंधांमध्ये देखील कडवटपणाचे कारण बनू शकतो. अहंकारामुळे काय बरोबर आणि काय अयोग्य हे ओळखताही येत नाही. आपले वैवाहिक जीवन घटस्फोटापर्यंत पोहोचू नये असे वाटत असेल तर तुम्हाला तुमचा अहंकार बाजूला ठेवावा लागेल. जोडीदाराचा स्वभावही लग्नाला घटस्फोटापर्यंत नेऊ शकतो. प्रेम आणि वेडेपणा यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे. अशा लोकांसोबत काही तास घालवणेही अवघड होऊन बसते. त्यामुळे सुसंवाद, निरपेक्ष प्रेम, एकमेकांना आहे तसे समजून घेणे फार महत्वाेचचे असते. तरच वैवाहिक जीवन समृद्ध व आनंदी राहते.