मार देण्यापेक्षा प्रेम द्या

मुले ऐकत नाहीत, हट्ट करतात, अभ्यास नीट करीत नाहीत, उलटून बोलतात म्हणून आई-बाबांचा संताप होतो. त्या संतापातून मुलांना मारले जाते. मुले तात्पुरती ऐकतात, हट्ट सोडतात.. पण म्हणून मुलांना मारल्याने शिस्त लागली असे होत नाही. मुलांना मारण्याचे परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होऊन त्याचा परिणाम मुलांच्या वर्तनावर, त्यांच्या विकासावर आणि सामाजिक वर्तनावर होतो; म्हणून तज्ज्ञ मंडळी मुलांना मारण्याऐवजी प्रेमाने समजून सांगण्याचा, समजून घेण्याचा सल्ला देतात.

तज्ज्ञ म्हणतात, मुलांना मारणे हा कुठल्याच समस्येवरचा उपाय नाही. याचा चांगला परिणाम होणे दूरच राहते. दुष्परिणामच जास्त होतात. मुलांना मारुन, त्यांच्यावर चिडून-ओरडून त्यांना शिस्त लावता येते, हा चुकीचा समज आहे. उलट मुलांना मारुन, त्यांच्यावर ओरडून पालक मुलांना असेच वागण्याचा जणू परवाना देत असतात. मुलांना आपल्या लहान भावंडांना मारण्याची सवय लागते. छोट्या चुका झाल्या तरी मुले आई-बाबा मारतील या शंकेने घाबरतात; आणि लहान भावंडांना मारुन, मारण्याची भीती दाखवून घाबरवतात. काही झाले की मारणे हाच योग्य पर्याय आहे, असा समज मुलांंच्या मनावर पक्का होतो आणि मुले मारकुटी, भांडकुदळ होतात.

मुलांना मारण्याचा परिणाम केवळ शारीरिक पातळीपुरताच मर्यादित राहत नाही; तर त्याचा मानसिक आणि भावनिक परिणामही होतो. मुलांकडून काहीही चुका झाल्यास पालक मुलांना मारत असतील, तर मुलांना आपण वाईट मुलगा अथवा वाईट मुलगी असल्याची जाणीव होते. या जाणिवेचा परिणाम म्हणजे त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो. मुलांचा आत्मविश्वास कमी होतो.

मारल्यानंतर मुले ऐकतात, हा पालकांचा गैरसमज आहे. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी मुलांना मारले गेले तर मुले स्वत:ला दोषी समजायला लागतात, पालकांना घाबरतात. त्यांना छोट्या-छोट्या गोष्टी सांगण्याचे टाळतात. मुलांना मारल्याचा परिणाम नात्यावर होतो. मुले आणि पालक यांच्यात दुरावा निर्माण करतो. मुलांना सतत शारीरिक शिक्षा केल्याने मुले काही काळ घाबरतात, दबकून राहतात. पण आई-बाबा काहीही झाले तरी मारतातच, असा समज करुन कोडगी होतात. थोडे मोठे झाल्यावर आई-बाबांना विरोध करणे, त्यांचे काहीच न ऐकणे , घरात-बाहेर चुकीचे वागणे अशा भूमिकेतून एक प्रकारचा विद्रोह पुकारतात. ही विद्रोही भूमिका मुलांच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम करते.

मुलांना मारल्या ने त्यांच्यात नकारात्मक भाव निर्माण होतात. आई-बाबा मारतात म्हणून आतल्या आता चडफडतात. सतत मनात राग साचत राहिल्याने हा राग नकारात्मक पध्दतीने बाहेर काढतात. मुले सतत मार खाऊन चिडचिडी आणि रागीट होतात.






10,431 वेळा पाहिलं