इंद्राई किल्ला

नाशिक जिल्ह्यात अजंठा-सातमाळ रांगेत चांदवड तालुक्यात राजधेर, कोळधेर, इंद्राई आणि चांदवड हे चार किल्ले आहेत. इंद्राई किल्ल्यांच्या पायथ्याचे गाव राजधेरवाडी आहे. या गावात २ दिवस थांबून राजधेर व इंद्राई हे किल्ले पाहता येतात. किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहेत. या किल्ल्यावर बारमाही पिण्याचे पाण्याचे टाके आहे.

इंद्राई गडाच्या प्रवेशद्वाराचे अवशेष तेवढे शिल्लक आहेत. राजधेरवाडीमार्गे गेल्यावर कातळभिंती मिळतात. या कातळकड्यापाशी कातळात खोदलेल्या २ गुहा आहेत. यापैकी एका गुहेत पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. येथून गडावर जाण्याचा मार्ग बनविलेला आहे. या मार्गाने ५० पायर्या चढून गेल्यावर वाट काटकोनात वळते. या मार्गाने अंदाजे १०० पायऱ्या चढून गेल्यावर डाव्या बाजूच्या कातळात कोरलेला फारसीतील शिलालेख आढळतो. प्रवेशद्वारातून पुन्हा थोडे चढल्यावर कातळात खोदलेल्या गुहा दिसतात.

हे पाहून परत मागे फिरल्यावर पुन्हा दुसरी वर जाणारी वाट पकडावी. थोडे चढून गेल्यावर बुजलेले पाण्याचे टाक आणि वास्तुचे अवशेष दिसतात. येथून सरळ पुढे जाणारी वाट माथ्‌यावर जाते. येथे कातळात खोदलेले महादेवाचे मंदिर मिळते. मंदिरासमोर दगडात बांधून काढलेला तलाव आहे. महादेवाचे दर्शन घेऊन गुहेच्या वर गेल्यावर एक मोठा तलाव आहे. तलावात उतरण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. या गडावर कातळात खोदलेल्या १८ ते २० गुहा दिसतात. डोंगराच्या मागे नाशिक – धुळे महामार्ग दिसतो. इंद्राई किल्ला पाहण्यासाठी २ तास लागतात