नकारात्मकता सोडावी

काही माणसे कोणतेही काम सुरू करण्याचा विचार करतात, त्यावेळेस जगभरातील नकारात्मक गोष्टी त्यांच्या हृदयावर आणि मनावर अधिराज्य गाजवतात. मग कितीही प्रयत्न केले तरी आपण एकाग्र होऊन काम करू शकत नाही. शेवटी अपयश आल्यावर स्वत:च्या नशिबाला शिव्या देतात. सत्य हे आहे की, आपल्या विचारांमुळे आपण आपली सुरळीत असलेलीही अनेक कामे बिघडवतो. यासाठी आपण आपल्या नकारात्मक भावनांवर सहज नियंत्रण ठेवायला हवे. त्यामुळे कौटुंबिक नातेसंबंधही उत्तम राहतात.

मी आधी सुरुवात का केली नाही, असा प्रश्न विचारण्याऐवजी आपण आपले भूतकाळातील जीवन बदलू शकत नाही, त्यामुळे कोणतेही चांगले काम सुरू करण्यासाठी आजच्यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही, असे मनावर बिंबवा. स्वत:ला प्रत्येक गोष्टीत दोष देत बसण्यापेक्षा प्रत्येक दिवसाला आपला शेवटचा दिवस मानून प्रत्येक दिवसाचा सदुपयोग करेन, असा विचार करा. कोणतेही काम अगदी मनापासून करा. त्यात अयशस्वी झालात, तरी किमान आपण सर्वोत्तम प्रयत्न केल्याचे, चांगला अनुभव मिळाल्याचे समाधान मिळते.

हे खूप कठीण आहे, मी हे कसे करू शकतो, असे प्रश्न विचारु नका. कठोर परिश्रमानंतरच यश मिळते, हे लक्षात घ्या. मला शून्यापासून सुरुवात करायची आहे, असे माना. इतर लोकांकडे जास्त पैसा आहे, ते खूप भाग्यवान आहेत, अशी तुलना करु नका. त्याऐवजी प्रत्येकाचा जीवन प्रवास वेगळा असतो. प्रत्येकाच्या उणीवाही वेगळ्या असतात, असा विाचर करा. कदाचित आपल्याकडे असलेले ज्ञान कोणत्याही श्रीमंत व्यक्तीपाशी नसेल. छोट्या गोष्टींसाठी मोठी पावले उचलणे थांबवू नका. जेव्हा आपल्या मनात काही नकारात्मकता येते, तेव्हा लगेच काही सकारात्मक काम करून ते वळवण्याचा प्रयत्न करा. चांगले संगीत ऐका, एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी बोला, पुरेशी झोपही घ्या, आणि नव्या मनाने स्वत:ला पुन्हा तयार करा.