
अनेकांना पूर्ण जेवण घेतल्यानंतर काहीतरी गोड खावेसे वाटते. काहीजणांना पोट भरलेले असूनही ‘फास्ट फूड’ किंवा ‘जंक फूड’ खावेसे वाटते, आणि मग ते खातात. भूक लागणे ही चांगली गोष्ट आहे. पण पोट भरलेले असतानाही अति खावेसे वाटणे ही चांगली गोष्ट नाही. याचा अर्थ आपल्यात काही शारीरिक कमतरता असण्याची शक्यता असते. सतत भूक लागते. त्यावेळी आपण अमर्यादपणे खातो. परिणामी, आपले वजन वाढू लागते. मग अनेक आजार त्रास देऊ लागतात. अशा परिस्थितीत स्वतःवर नियंत्रण ठेवणे आणि अन्नाच्या लालसेपासून वाचण्यासाठी आरोग्यदायी सवयी अंगीकारणे हाच उत्तम उपाय आहे.
अन्नाच्या अतिलालसेपासून आपण सुटका मिळवू शकतो. यासाठी आपला आहारतक्ता नेहमी पौष्टिक असावा. याने पोट नेहमी भरलेले राहते. पोट भरल्यावर जास्त खाण्याची इच्छा होत नाही. याकरिता अन्न नेहमी ताजे असावे. नेहमी काहीही गोड खाण्याची इच्छा असते. अशा परिस्थितीत, स्वतःची भावनिक परिस्थिती संतुलित ठेवावी. तणाव टाळावेत. सर्वप्रथम, स्वतःला शांत ठेवावे. कोणत्याही प्रकारच्या चिंता आणि तणावापासून दूर रहावे.
झोप कमी असली तरीही अतिपदार्थ खाण्याचा मोह होतो. त्यामुळे रोज ७-८ तासांची पुरेशी झोप घ्या. नेहमी गोड पदार्थांनीच खायला सुरुवात करा. आहारात देशी तूप असणेही चांगले असते. कोरड्या आल्याचा (सुंठ) आहारात नक्की समावेश करावा. साखरयुक्त पेयाऐवजी एक ग्लास कोमट पाणी प्यावे. पूर्ण जेवण घेतल्यानंतर किमान दोनशे पावले चाला. जेवणानंतर बडीशेप, छोटी वेलची, लवंग चावून खावे. अर्थातच दिवसभरात खूप पाणी प्यावे.