रामनवमी

मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ रामनवमी साजरी केली जाते. श्रीराम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले जातात. दरवर्षी हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या नवव्या तिथीला श्री रामनवमी साजरी केली जाते. चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंतही हा सोहळा साजरा करतात. या दिवसात अनेक लोक उपवास करतात. हा सण विशेषतः वैष्णव समाजात साजरा करतात. या दिवशी भाविक रामायणाचे पठण करतात. रामरक्षा स्तोत्र वाचतात. अनेक ठिकाणी भजन-कीर्तनाचे आयोजनही केले जाते. प्रभू श्रीरामांची मूर्ती पाळण्यामध्ये घातली जाते व जन्मसोहळा साजरा केला जातो.

यादिवशी श्रीरामांची पूजा करताना सर्वप्रथम स्नान करून पवित्र होऊन पूजास्थळी बसावे. पूजेत तुळशीची पाने आणि कमळाची फुले अवश्य असावीत. त्यानंतर श्री रामनवमीची षोडशोपचारे पूजा करावी. प्रसाद म्हणून खीर आणि फळे ठेवावीत. रावणाच्या अन्यायाने जनता त्रस्त झाली होती. त्याने देवांकडून अमरत्वाचे वरदान घेतले होते. त्याच्या अत्याचाराला कंटाळून देव विष्णूंकडे गेले, आणि प्रार्थना केली.

परिणामी, रावणाचा पराभव करण्यासाठी राजा दशरथांची पत्नी कौसल्या हिच्या पोटी भगवान विष्णूंनी श्रीरामाच्या रूपात जन्म घेतला. त्यांनी रावणाचा वध केला. तेव्हापासून चैत्राची नवमी तिथी रामनवमी म्हणून साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. नवमीच्या दिवशी स्वामी तुळशीदासांनी ‘रामचरित मानस’ रचण्यास सुरुवात केली, असेही म्हटले जाते.