नागपंचमी

नागपंचमी हा वेदकाळापासून चालत आलेला सण आजही भक्तीभावाने साजरा केला जातो. दरवर्षी श्रावण महिन्यात नागपंचमी येते. भारतीय संस्कृती मुळची कृषिप्रधान आहे. नाग हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो शेतीची नासधूस करणाऱ्या उंदरांचा नायनाट करतो. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागोबाची मूर्तीस्वरुपात घरोघरी पूजा केली जाते. श्रावण महिन्यातील हा पहिला सण आहे. याद्वारे नाग या प्राण्याबद्दल आदर भावना व्यक्त केली जाते. नागांमुळे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण राहते.

यादिवशी सकाळी महिला घराची स्वच्छता करतात. जमिनी शेणाने सारवितात. रांगोळी काढतात. नागाचे चित्रे भिंतीवर काढतात. त्या चित्राखाली त्याची पूजा करतात. काही ठिकाणी नागाच्या वारुळापाशी महिला गाणी म्हणतात, फुगड्या खेळतात. महाराष्ट्रात काही ठिकाणी यादिवशी जिवंत नागाची पूजा केली जाते. सांगलीतील बत्तीस शिराळा याठिकाणी अशी पूजा होते. नागोबास दूध-लाह्यांचा नैवेद्य दाखविला जातो. जेवणात गोड पदार्थ बनविले जातात. यादिवशी काही ठिकाणी पदार्थ चिरत नाहीत, भाजत नाहीत, तळत नाहीत. अशा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आहेत. कोकणात नागपंचमीस हळदीच्या ओल्या पानांमधील ‘पातोळी’ हा पदार्थ बनविला जातो. काही ठिकाणी पुरणाचे दिंडे बनवतात. कातरवेळेस नागोबाची उत्तरपूजा करून अळूच्या पानांमध्ये नेऊन ही मूर्ती ठेवली जाते.

या सणाच्या निमित्ताने बहिणी भावाच्या समृद्धीसाठी उपवास करतात. नागपंचमीला स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणे म्हणत झोके घेतात. पूर्वी महिला झिम्मा-फुगडी, पिंगा इत्यादी खेळ मनसोक्त खेळायच्या. खेळता-खेळता उखाणे, गाणी म्हणून मन मोकळे करायच्या. अर्थात, नागपंचमी हा एक उत्साहवर्धक सण आहे. नागपंचमी साजरी करण्यामागे काही काल्पनिक कथा सांगितल्या जातात, मात्र नागदेवतेप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करण्यासाठीच हा सण मुख्यत्वेकरुन साजरा केला जातो.