
गोदावरी नदीवरील जायकवाडी धरण पाहण्यासाठी अनेक पर्यटक आवर्जून जातात. हे धरण औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीवर आहे. मराठवाड्यातील जवळजवळ २.४० लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आले आहे. हे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून ओळखले जाते. पूर्ण क्षमतेने भरलेले धरण दोन वर्षांची शेतीच्या पाण्याची आणि ४ वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय करते.
या धरणावर औरंगाबाद आणि जालना या दोन महानगराच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. या योजना ४०० गावांची तहान भागवितात. या धरणामुळे झालेल्या जलाशयास ‘नाथसागर’ असे म्हणतात. यावर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि नांदेड हे पाच जिल्हे जायकवाडी धरणावर अवलंबून आहेत.

औरंगाबादमधील वाळूज, शेंद्रा, चिखलठाणा, पैठण आणि जालना औद्योगिक वसाहती या धरणावर अवलंबून आहेत. जायकवाडी धरण मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला चालना देणारे आहे. या अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे हे धरण पाहण्यास लोक जातात. येथील परिसरसुद्धा फार मनमोहक आहे. शिवाय गोदावरी नदीचेही दर्शन होते.